बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

ख्वाडा - एक समृद्ध अडथळा


नेहमीचा चष्मा लावून हा चित्रपट बघु नका, वेगळा चष्मा लावा.
फ्यांड्री, कोर्ट आणि आता ख्वाडा.
कुठे मिळतात हे चष्मे? कुठल्या दुकानात?
खरेतर ख्वाडा पाहिल्यावर त्यावर काही लिहावे असे वाटले नाही. पण चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड आहे, ऑडिओग्राफी, कॉस्च्युम आणि रंगभूषेचही अवॉर्ड आहेत. चित्रपटाच्या सुरूवातीला अनेक दिग्गजांच्या नावाची मांदियाळी आहे, म्हणजे त्यांना हा चित्रपट मान्यच नाही तर त्यांची यात काही ना काही इनवोल्व्हमेंट असावी. म्हणून तरी लिहावं असं आतून वाटत होतं. म्हणून मग पुन्हा पहिला. दोन्ही वेळेला साधा चष्मा लावूनच पहिला. वाटलं होतं दुसर्‍यांदा तरी काही वेगळं दिसेल, पण नाहीच दिसलं काही.

पहिल्यांदा मुलुंड मध्ये आर मॉल मध्ये पहिला आणि नंतर दादरला प्लाझामध्ये. चित्रपटाचे डोल्बी किंवा सराउंड साऊंड फारस चांगलं नाही.  मला वाटलं होतं आर मॉलच्या साऊंड सिस्टमचा हा दोष असेल पण प्लाझा मध्येही साऊंड तसाच वाजला. खास करून मागून येणारा आवाज अत्यंत अनैसर्गिक वाटतो. चित्रपटाला ऑडिओग्राफी या विभागासाठी राज्य पुरस्कार आहे. दूसरा राज्य पुरस्कार आहे कपडेपट किंवा कॉश्च्युम साठी. मराठी चित्रपटात कपडेपट हा अत्यंत दुर्लक्षित विभाग. चित्रपट जेव्हा ब्लॅक अँड व्हाइट होते तेव्हा ठराविक काळ दाखवण्यापूरता फार तर कपडेपटाचा वापर होत असे. परंतु चित्रपटाने रंग धारण केल्यावर कपडेपटातून वातावरण निर्मिती करता येऊ लागली, मूड जपता येऊ लागले, परंतु काही अपवाद वगळता मेन स्ट्रिम मराठी सिनेमात अजून ही जाणीव यायची आहे. ख्वाडा त्याला अपवाद नाही.

माझ काळीज लागलं नाचू न गाणं वाजू द्या. हे गाणं खरेतर आयटम सॉन्ग आहे. चित्रपटाच्या कथानकात त्याचा काही उपयोग नाही पण गाणं म्हणून वेगळं पहिलं तर डॉ. विनायक पवारांनी ते छान लिहिलय. पारंपारिक लग्नगीताच्या ढंगाने रोहित नागभिडेंनी ते संगीतबद्धही चांगलं केलय. संगीताशिवायची धनगरगीते अतिशय परिणामकारक झाली आहेत. पार्श्वसंगीत अगदीच मोजकं आहे, कळेल न कळेल असं. सिनेमटोग्राफीत अनेक ढोबळ चुका आहेत, पण निर्माता दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट असल्याने हे सगळं माफ आहे.

सिनेमा सुरू होतो तो धनगरांच्या एका तांड्यापासून आणि थोड्याच वेळात लक्षात येत सिनेमा एका गावकुसा बाहेरच्या भटक्या जमातीच्या जीवनाबद्दल काही बोलतो आहे. रस्त्यावरून जाणारा एक इसम रघु धनगराच्या धाकट्या मुलाच्या, बाळूच्या लग्नाची चौकशी करतो आणि इथून सुरू होतो बाळूच्या लग्नाचा व्हिडिओ. मुलगी बघितली जाते मुलगी पसंद पडते पुढची बोलणी होतात आणि हळदही लागते. बाळू हा रघु धनगराच्या कुटुंबात न शोभणारा पैलवान गडी. आजूबाजूला दुष्काळाची परिस्थिति. सतत एक करडी, शुष्क पार्श्वभूमी. त्या पार्श्वभूमीवर वाहणारी निळीशार नदी. ती जितकी विसंगत वाटते तितकीच बाळूची शरीरयष्टी त्या कुटुंबात विसंगत वाटते. पण असे असू शकते असे मानून आपण चित्रपटात पुढे सरकतो आणि पुढे विकसित होत जाते बाळूचे व्यक्तिमत्व. बाळू हा चित्रपटाचा नायक आहे. लेखकाला त्याच्या हातून काही गोष्टी पुढे करून घ्यायच्या आहेत. त्याचे व्यक्तिमत्व हा चित्रपटाच्या कथानकाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात बाळू हा रंगेल आणि स्वप्नाळू गडी म्हणून समोर येतो. रघु धनगर, बाळूचा बाप हा एक तापट डोक्याचा म्हातारा, पण अनुभवी धनगर आहे. शेळ्या मेंढ्यांची त्याला नीट पारख आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या विषयी जिव्हाळा आहेच पण धनगरांच्या परिभाषेत त्या त्याच्या संपत्तिचे परिमाण आहेत. तो व्याहयाची संपत्तिसुद्धा पारंपारिक पद्धतीने शेळ्यामेंढ्यांमध्येच मोजतो. चित्रपटातले हे एकमेव पात्र जे लेखकाने पुरेश्या ताकदीने लिहिलं आहे आणि शशांक शेंडेंनी तितक्याच ताकदीने ते उभे केले आहे. धनगरी हेल, शिव्या, देहबोली, व्यवहारी खाचाखोचा हे सगळं शेंडेंनी पुरेश्या मेहनतीने साकारलं आहे. रघुच्या कुटुंबातली बाळू खेरीज दुसरी दोन महत्वाची पात्रे बाळूची आई आणि बाळूचा भाऊ, पांड्या. प्रशांत इंगळेच्या अंडरप्ले अभिनयाने वडलांच्या धाकाने दबलेला पांड्या पुरेपूर उभा केलाय. तो करीत काहीच नाही पण अनेक प्रसंगातील त्याच अस्तित्वच खूप बोलक वाटत. माझं सासार हलकट होत, आता बघूया ना हे किती कमरेच सोडून देतात ते. असं एखादच वाक्य इंगळे सहजतेने म्हणून जातात पण त्या प्रसंगात जान येते. दूसरा उल्लेख करायला हवाच तो बाळूच्या आईची भूमिका करणार्‍या सुरेखाचा. राग, प्रेम, अगदी नवर्‍याला शिव्या देतानाही ती आपण एक पायरी खाली आहोत हे भान ठेऊन ती व्यक्त होते, पण ती बोलते. अभिनयाबाबत बोलताना एका छोट्याश्या बाबीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शेवटच्या प्रसंगात बानु, वैष्णवी ढोरेने जो एक लुक दिला आहे तो अप्रतिम आहे. त्या एका लुक मध्ये नेमकं काय घडलय याची पुरती जाणीव ती करून देते. चित्रपटात तिच्या वाट्याला संवाद जवळ जवळ नाहीच आहेत. केवळ मुद्राभिनयावर या मुलीने आख्खी बानु उभी केलीय. पण शेवटचा लुक अप्रतिम. एकंदरीत चित्रपट लेखनात संवादाची बाजू उत्तम आहे. खास धनगरी बोलीभाषेतील मिश्किल पण खोचक संवाद प्रसंगाला उठाव आणतात, प्रेक्षकांची दादही मिळवतात. पण केवळ संवादावर चित्रपट कितीसा तरणार? पहिल्या वीस मिनिटात पटकथा ढेपाळत जाते. एकतर अनेक पात्रातले एकमेकातले आणि स्थावर गोष्टीतले परस्पर नातेसंम्बंध नीट अधोरेखित होत नाहीत. धनगरांच्या जीवनातले वेगळेपण ठसठशीतपाने समोर येत नाही. त्यांच्या लग्नातील प्रथा या जवळपास बहुजन समाजासारख्याच आहेत. वेगवेगळ्या धनगर कुटुंबातील किंवा समाजातील नातेसंबंध सुद्धा नीटपणे उभे राहत नाहीत, त्यामुळेच शेवटच्या प्रसंगात बाळूने भीमाच्या तांड्याची मदत मागणे आणि त्यांनी ती त्या पातळीवर जाऊन देणं हे अगदीच अवास्तव वाटतं.    

रघुची जमीन फॉरेस्ट मध्ये गेलीय हे फक्त एका संवादात येते. रघु गेली दहा वर्षे कोर्टाच्या खेपा मारतोय हे दुसर्‍या एका छोट्याश्या प्रसंगात येते. पांड्या बापाच्या वतीने एक नवीन जमिनीचा तुकडा विकत घेण्यासाठी जमीन पाहतो हा तिसरा एक प्रसंग. या तीनही प्रसंगातून जमिनीबाबतची या तीनही पात्रांची किंवा एकंदरीत या कुटुंबाची मानसिक गुंतवणूक पुरेश्या ताकदीने पुढे येत नाही आणि इथेच सगळी गफलत होते. खरे तर हे सगळं करण्यासाठी लेखकाच्या हातात पुरेसा वेळ होता तो सगळा त्याने बाळूच्या न झालेल्या लग्नावर खर्च केला आणि पुढे अनेक प्रश्नचिन्हे उभी केली. ज्या जमिनीत पुरेशी मानसिक गुंतवणूक नाही ती जमीन व्याहयाने घेतली म्हणून बाळूचे लग्न रघु का मोडतो? हा त्याचा तापट विचित्र स्वभाव आहे हे गृहीत धरलं तरी ज्या मुलीमध्ये बाळूची पुरेपूर मानसिक गुंतवणूक झालेली आहे तिच्याशी मोडलेल्या लग्नापायी बाळू बंडखोरी करून बापच घर सोडत नाही मात्र जमीन विकली गेली म्हणून, ज्या जमिनीत बाळूची काडीची मानसिक गुंतवणूक नाही त्या जमीनीसाठी बाळू बापाशी भांडून घर का सोडतो? मुळात हे जमीन आणि लग्न प्रकरण एकंदरीत पुढे येऊ घातलेल्या मुख्य प्रसंगाशी किती संबंधित आहे? बाळूच लग्न आधीच झालेलं असतं आणि जमीन हे प्रकरणच नसतं तर कथेच्या क्लायमॅक्स मध्ये काय फरक पडला असता? किंवा एकंदरीतच सिनेमाला जे सांगायचय त्यात काय फरक पडला असता? असे अनेक प्रश्न पटकथा उभे करते आणि चित्रपट सरपटत जातो.

बाळू आणि सरपंच अशोक यांच्यातला खरा संघर्ष सुरू होतो एका कुस्तीच्या फडातून. बापाशी भांडून बाहेर पडलेला बाळू बापाच्या मेंढरांचे पैसे मागायला अशोककडे येतो इथे संघर्षाची दुसरी ठिणगी पडते. याही प्रसंगी बाळू सरस ठरतो. त्याचे सरस ठरणे तरीही नैसर्गिक वाटते, यात कुठे हिरोइझम जाणवत नाही. पण अशोकशी पंगा घेतल्यावर बाळूचे बापाकडे धावत परत येणं मात्र त्याच्या बंडखोरीला सुसंगत वाटत नाही. मुळात या बंडखोरीचा पायाच निसरडा असल्याने हे सगळच मग लिबलिबीत वाटू लागत.  बापाची बळजबरीने नेलेली मेंढर सोडवायला लेखक बाळूला जो मार्ग दाखवतो त्या मार्गावरून जाण्याइतका बाळू कणखर वाटत नाही तो यामुळेच. तो सतत एक गुलछबू, रंगेल पैलवान गडीचं वाटत राहतो, याला कारण पहिल्या निम्म्या भागात दळलेल लग्नाचं दळण.

खरेतर चित्रपट जो संघर्ष दाखवू पाहतो आहे, तो आहे गावकूसाबाहेरील जगणं जगणार्‍या, ‘रोज दुसर्‍याच्या बांधावर जाव लागणार्‍या एका भटक्या संस्कृतीचा गाव ह्या एका बलाढ्य संस्थेशी, एका व्यवस्थेशी. पण ज्या तपशिलाने गावकूसाबाहेरच्या रघु धनगराच्या कुटुंबाच वर्णन चित्रपटात दिसतं त्याच्या शतांश भागानेही चित्रपटात गाव दिसत नाही. चित्रपटातला खरा खलनायक ही परिस्थिति आहे, ही व्यवस्था खलनायक आहे. सरपंच अशोकदादा  हा केवळ त्या व्यवस्थेचा एक प्रतिनिधी आहे. अशोकची व्यक्तीगत व्यक्तिरेखा दमदार असली आणि अनिल नगरकरांनी ती आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने उत्तम केली असली तरी, व्यवस्था किंवा व्यवस्थेच रूप म्हणून अशोकदादा समोर येतो का? पहिल्यांदा अशोक येतो तो एका मोटार सायकल वरून आणि दुसर्‍यांदा एका जुनाट खटारा जीप मधून. खरे तर ह्या व्यवस्थेला एक चकचकीत रूप आहे, तिचा रुबाब आहे, तिचा भन्नाट वेग आहे. पण अशोकच्या मोटर सायकल आणि जीप पेक्षा बाळूचा घोडा अधिक उमदा वाटतो, अधिक वेगवान वाटतो. सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या फ्रेम मध्ये प्रथम दिसतो तो घोडा. बाळू लग्नानंतर जेजूरीला जातो. जेजूरीचा खंडोबा हे धनगरांचे श्रद्धास्थान. खंडोबा हे शक्तिच प्रतीक. त्याचं वाहन घोडा, त्याची ती अजस्त्र शस्त्रे या सगळ्याचा संबंध शेवटच्या प्रसंगाशी दिग्दर्शकाला लावता आला असता. पण जेजूरी आणि पुढे कुठल्यातरी एका जत्रेत काही रिळ निव्वळ दर्शनीय या एकाच कारणासाठी फुकट घालवली गेली आणि लक्षात राहील ते बाळूने बायकोला उचलून जेजूरीच्या पायर्‍या चढण.

मुळात हा संघर्ष एक भ्रष्ट व्यवस्था विरुद्ध संस्कृती असा उभाच राहत नसल्याने मग तो उरतो फक्त बाळू आणि अशोक या दोन व्यक्तिमधला संघर्ष आणि मग प्रश्न उभा राहतो चित्रपटात खलनायक म्हणून अशोकची जी काही व्यक्तीगत कृत्ये आहेत ती इतकी मोठी शिक्षा देण्याजोगी आहेत का? गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रात, ज्या ठिकाणी हा चित्रपट घडला त्याच भागात वास्तवात ज्या घटना घडल्या त्या अत्यंत भयानक आहेत. त्या घटनांचा वेध घेता असे लक्षात येईल की आजच्या 'अशोकदादा'ची मग्रुरी ही केवळ पूर्वीच्या गावागाड्याच्या संस्कृतीतून आलेली नाही तर तिला आजची राजकीय पार्श्वभूमी आहे. अशोक हा आजच्या काही ठराविक राजकीय पक्षांचा प्रतिंनिधी आहे. चित्रपटातल्या  शिक्षापर्वा नंतर ज्या पद्धतीने बाळू आणि त्याच्या साथीदारांना चोर, लुटेरु ठरवलं जातं. हे ठरवण्याची एक प्रोसेस आहे, जी तद्दन राजकीय आहे. परंतु चित्रपटात हा भाग केवळ काही वर्तमानपत्रातील हेडलाइन मधून येतो आणि प्रकरण संपून जाते. दिग्दर्शकाला चित्रपटात राजकीय भूमिकाच घ्यायची नाहीय. हे असं का घडतय याच्या खोलात जायचं नाहीय. त्याला निव्वळ एक कथा सांगायची आहे. सुष्ट आणि दुष्ट यांच्यातला संघर्ष आणि दुष्टाचा पराभव, सुष्टाचा जय, जी कथा महाभारतासारखा  ग्रंथ ते काल परवाचा मराठी हिन्दी मसाला सिनेमा सांगत आला. तीच कथा.  

सरते शेवटी प्रश्न उरतो चित्रपट काय देतो?
सत्तरच्या दशकात याच कथेवर अनेक मराठी चित्रपट येऊन गेले. अगदी लाटच आली होती. फक्त तिथे सरपंचाऐवजी पाटील असे आणि धनगरांच्या जागी बहुत करून तमासगीर असत. परंतु त्याही काळी अनेकदा आडवळणाने का होईना पण राजकीय भूमिका घेतली जात असे. सामना हे अलीकडील एक उदाहरण. पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य द्राक्ष लॉबी जी कॉंग्रेस संस्कृतीचा भाग होती त्याचे जब्बार पटेलांनी सामनात उघड दर्शन घडवले होते आणि आज उभ्या महाराष्ट्रात आणि देशातही या व्यवस्थेच्या पायी अनेक संस्कृत्या, जीवंत माणसे जात आणि धर्माच्या नावाखाली चिरडली जात असताना राजकीय भूमिका घ्यायचीच नाही आणि केवळ गोष्टी सांगत सरकारी पुरस्कार मिळवायचे ते कशाला? 
पुन्हा कधी काळी सरकारचा निषेध करून परत करायला?  
  
असो, चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, ही जमेची बाजू आहे. चित्रपट चांगला धंदाही करतो, आहे हे ही चांगलच आहे. मात्र मराठी प्रेक्षकांची अभिरुचि हा चित्रपट बदलू शकतो का?
माझ्या पुरतं तरी याच उत्तर नाही असच आहे. 

                             *****   



शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

निर्वासितांचा निरोप - एसओएस युरोप

जिनिव्हा शहरातून लिबियातील निर्वासितांच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा. 
                   मानवता, संवेदनशिलता यांना आव्हान देणार्‍या घटना गेल्या काही वर्षापासून युरोपमध्ये घडत आहेत. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लिबिया आणि इटलीच्या दरम्यान मेडिटेरियन समुद्रात एक बोट बुडाली आणि २० माणसे मेली आणि कित्येक अजून बेपत्ता आहेत. बोटीवर जवळपास तीनशे माणसे होती, ती सर्वच बुडाली असण्याची शक्यता आहे. अर्थात ही काही पहिली किंवा एकच घटना नाही. या वर्षात म्हणजे गेल्या केवळ पाच महिन्यात दीड हजारापेक्षा जास्त माणसे या समुद्रात अशाच बोटी बुडून मेली आहेत. गेल्या वर्षी तीन हजारावर माणसे मेली.

कोण आहेत ही माणसे आणि त्यांच्या बोटी अशा का बुडतात?
                       
                       गेली काही वर्षे उत्तर आफ्रिकेतले गरीब कृष्णवर्णीय लोक तिथल्या गरिबीला कंटाळून कुठल्याही कागदपत्रांशिवाय रोजगाराच्या आशेने लिबियातून इटलीमार्गे युरोपमध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अगदी रोजगार नाही मिळाला तर भीक मागायची त्यांची तयारी असते. या देशांतराला  उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, सुदानसारख्या देशांतील युद्धजन्य यादवी परिस्थितिही करणीभूत आहे. लिबियातले काही ह्यूमन ट्राफिकिंग करणारे माफिया अशा गरीब लोकांकडून भरपूर पैसे घेऊन त्यांना या बोटींमध्ये बसवून देतात. या बोटी बेकायदेशीर असतात. त्यांची नीट डागडुजी केलेली नसते. कधी कधी तर त्यात पुरेसे इंधनही नसते. अशा काही बोटी मग भर समुद्रात बुडतात. काही पोहचल्याच युरोपच्या एखाद्या किनार्‍यावर तर यातले काही लोक युरोपात प्रवेश करतातही पण मग त्यांना घुसखोर ठरवून पोलिस आणि प्रशासन त्रास देतात.
                        गेल्या काही वर्षात हे जे काही हजार लोक बुडाले आणि त्यातले अनेक बेपत्ता झाले त्यांच्या शोधकार्यासाठी आणि उपचार आणि पुनर्वसनासाठी यूरोपियन युंनियनने काही मिलियन युरो खर्च केले आहेत. या खर्चाबाबत युरोपात अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. या काळ्या लोकांसाठी आमचा पैसा का खर्च करायचा? ही एक उग्र प्रतिक्रिया आहेच पण या प्रतिक्रियांमागे युरोपमध्ये अलीकडे झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्याचीही पार्श्वभूमी आहे, धार्मिक द्वेषाची झाक या विचारसरणी मागे आहे. आता तर इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगुनच टाकले आहे की यापुढे इंग्लंड शोधकार्य आणि बचावासाठी पैसा खर्च करणार नाही कारण त्यामुळे  घुसखोरांना उत्तेजन मिळते. या उद्गारांवर युरोपात कुठे संताप व्यक्त होतोय, तर कुठे सूचक शांतता आहे.
                        एप्रिल महिन्याच्या २० तारखेला ही बोट बुडाल्यानंतर चार दिवसात त्याचे पडसाद जिनिव्हामध्ये उमटले. जिनिव्हाच्या बाजारपेठेतून हजारभर स्विस लोकांनी एक मुक मोर्चा काढला. त्यात कृष्णवर्णीयांच्या बरोबरीने मोठ्या संखेने गोरे युरोपियनही होते याच मला आश्चर्य वाटलं. स्वत:च्या देशात घुसखोरी करणार्‍यांबद्दाल यांना सहानुभूती कशी असू शकते? मात्र यांच्याशी बोलल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला.
का तुम्हाला वाटते की या समस्येला आपण पाठिंबा द्यावा, हे लोक तर तुमच्या देशावर भार आहेत आणि तुम्ही तुमच्याच सरकारच्या समोर मोर्चा काढता आहात?’ मी एका गोर्‍या बाईला हा प्रश्न विचारला.
ही आमची, आमच्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे कारण इतकी वर्षे आफ्रिकेतल्या या गरीबांना आम्ही नागवत आलो. त्यांची नैसर्गिक संसाधने लुटत आलो. आता हीच वेळ आहे त्यांना काही परत करण्याची.
म्हणजे काय करायला हवे असे तुम्हाला वाटते?’
देशाच्या सीमा उघड्या करायला हव्यात.
हे म्हणजे फारच झाले असे मला वाटले. पण अशाने तुमच्या देशाची सगळी व्यवस्था कोलमडणार नाही काय?’
पण कधीतरी हे करायलाच हवे आहे. किती दिवस आम्ही हे झाकून ठेवू शकतो? टप्प्याटप्प्याने तरी हे करायला हवय, मग त्याची सुरुवात आज पासून का करू नये? आज आमच्या देशाची लोकसंख्या पाहता आम्ही गरजेपेक्षा अधिक कवटाळून बसलो आहोत आणि शिवाय दुसर्‍यांना नाडत आहोत.
हा अतिडावा विचार वाटेल पण हे सत्य आहे. युरोपातील अनेक शहरे माणसांविणा भकास वाटतात. इथले स्पेसचे डायमेंशनच वेगळे आहे.
या समस्येवर नेमका उपाय काय असू शकतो?’ मोर्च्यातल्या आणखी एका गोर्‍या स्विस माणसाला मी प्रश्न केला.  
यांना रीतसर युरोपात यायला परवानगी द्यावी. कामाच्या संधि उपलब्ध करून द्याव्यात. नाहीतरी आम्हाला अनेक गोष्टींसाठी जीवंत माणसे हवीच आहेत. आम्हालाही वॉचमन हवेत, ड्रायवर हवेत, रस्ता झाडायला स्विपर हवेत. घरगडी हवेत. यासगळ्या ठिकाणी आम्ही मशीन लावून ठेवल्यात. इथली अनेक रेल्वेस्टेशन्स मानवरहित आहेत. किमान पुढच्या काळात मशीनवरची डिपेंडन्सी कमी होईल. तो गोरा माणूस सांगत होता.
आणखी एक राजकीय विचार चर्चेत आहे तो म्हणजे सगळ्या युरोपने याची जबाबदारी घ्यावी आणि उत्तर आफ्रिकेत, लिबिया वगैरे सारख्या देशात शहरे वसवावीत. आपल्या कंपन्या तिथे स्थापाव्यात आणि रोजगाराच्या संधि उपलब्ध करून द्याव्यात. हे ही एक प्रकारचे कॉलनाझेशन आहे, पण फारतर पॉजिटिव कॉलनाझेशन म्हणता येईल. आणखी एका गोर्‍या माणसाची ही प्रतिक्रिया होती.
                        हे सगळे मानवतावादी विचार थोर असले तरी ते युरोपात अल्पमतात आहेत. इथेही उजवे गट आहेत. उजव्या, राष्ट्रवादी विचारांचे राजकीय पक्ष इथे आहेत. मागच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त मते मिळवलेला स्विस पीपल पार्टीसारखा उजवा पक्ष स्वीत्झर्लंड मध्ये लोकप्रिय आहे आणि या विषयावर त्यांची टोकाची राजकीय मते आहेत.
                        जिनिव्हा शहराचा महापौर, सामी कन्नान मोर्च्यात होता. या बाबतीत त्याचे मत विचारल्यावर तो म्हणाला, अशी निदर्शने करून आम्ही फारतर स्विस सरकारकडे या लोकांच्या सुरक्षेसाठी, बचाव आणि शोधकार्यासाठी दबाव आणू शकतो, पण यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे गरजेचे आहे आणि सध्यातरी ते कठीण वाटतय. त्यासाठी काही लांब पल्ल्याच नियोजन हवं.

                        एकीकडे युरोपची अर्थव्यवस्था ढासळते आहे. रोमानिया वगैरे सारख्या यूरोपियन देशातल्या गरिबांचे लोंढे जर्मनी, स्वीत्झर्लंडसारख्या श्रीमंत देशात येऊन धडकत आहेत. ते यूरोपियन नागरिक असल्याने त्यांना कायदेशीररित्या अडवण कठीण आहे. त्यात आता आफ्रिकेतल्या या निर्वासितांचे लोंढे ही यूरोपियन देशांची वाढती डोकेदुखी ठरते आहे. 

                                *****

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

वर्ष होऊन गेलं असेल.

माधवराव गाडगीळांची मुलाखत घेऊन खाली उतरलो तर धोधो पाऊस पडत होता. हे पावसाचे दिवस नव्हेत, त्यामुळे छत्री घेण्याचा प्रश्न नव्हता. पाऊस सुरू झाला तो थांबेचना. कसा बसा एका आडोश्याला उभा होतो. बघता बघता रस्ता भरून गेला आणि पाणी फुटपाथला लागलं. दूरवर कुठे रिक्शा दिसत नव्हती. त्यात पाषाणहून स्टेशनला जायला थेट बस नाही, मध्ये पालिकेजवळ उतरून चेंज करायला हवी. घड्याळात पहिलं तर सात वाजले होते. म्हटलं शेवटची पावणे आठची गाडी चुकली. मग आरामात त्या बेमोसमी पावसाची गंमत अनुभवत उभा होतो. शेवटी कसाबसा स्टेशनला पोहोचलो तेव्हा आठ वाजून गेले होते, पाऊस थांबला होता. पुण्यात एक प्रॉब्लेम म्हणजे पावणे आठची अहमदाबाद गेली की नंतर मुंबईला जायला पुढची गाडी थेट मध्यरात्री सुटणारी कोणार्क. मग प्लॅटफॉर्मवरचा एक निवांत बेंच गाठला आणि सॅक मधून पुस्तक काढून वाचू लागलो. बराच वेळ झाला. थोड्या वेळाने लक्षात आलं माझ्या शेजारी कुणीतरी बसलं होतं. 


मध्येच काहीतरी गडबड ऐकायला आली. पाहिलं तर बाजूला दोन पोलिस नशेत बरळणार्‍या एका भिकार्‍याला तिथून हटवित होते. काठीने ढोसल्यावर तो अधिकच हात पाय ताणून लोळत होता. 
काय राव हे, ही साली जिंदगी एकदाच भेटते, तिचा असा कचरा कश्यापाई करतात हे लोक?’

मी चमकून शेजारी पहिले, एक सतरा अठरा वर्षांचा पोरगा बाजूला बसला होता. अंगात वर भडक रंगाचं शर्ट खाली जिन. कपडे टपोरी असले तरी नवीन दिसत होते. उजव्या हातात लाल भगव्या रंगाचे गंडे दोरे गुंडाळलेले.  
आपल्याला म्हाराजांनी सांगितलय काय बी झालं तरी ताठ मानेनं जगायचं. साव्भिमान पायजेलच.

कोण महाराज?’ त्याच्या हातातले गंडे दोरे पाहून मला वाटलं असेल कुणीतरी बाबा बुवा.
म्हाराज . . म्हाराज  . . छत्रपती. 
गळ्यातल्या चेनच्या पेंडल मधला शिवाजी महाराजांचा फोटो माझ्या समोर धरत तो बोलला.  

मी म्हटलं, यांनी कसं काय सांगितल तुला?’

म्हंजे काय? वाचलाय ना आपन आनि आयक्लय बी.

कुठे ऐकलस?’

सायेब, बारा वर्सांचा होतो तेव्हा घर सोडलं. भटकत भटकत पुन्यात आलो. कायबी काम करायचो. हाटेलात कामं केली. तिथं आपल्याला येक गुरु भेटला. लय पोचलेला. म्हाराज म्हटलं की काय बी ईचारा, एकदाम रट्टाच मारनार. त्यानं आपल्याला म्हाराजास्नी भेटवला, बास्स सगळी साली जिंदगीच बदलून गेली.

आता मी जरा लक्ष देऊन ऐकू लागलो.

एका प्येट्रोल पम्पावर काम करीत होतो. गाडी प्येट्रोल भरायला आली की फडका मारायची आपली येक खास स्टायल होती. अशीच एका सायबाची गाडी रोज यायची प्येट्रोल भरायला. फडका मार्‍ला की सायब खुश व्हायचा. येके दिवसी मला म्हन्ला गाडी रोज धून देनार का? मी फाटदिशी हो म्हटलं. आपल्याला म्हाराजांनी सांगितलेलं हाय, संधि आली का सोडायची नाय. गेल्याली संधि परत येत नाय.

मग?’

मग काय? रोज सकाळी घरी जावून सायबाची गाडी धुवायचो आनि मग पम्पावर यायचो.

मी पुस्तक मिटून सॅकमध्ये ठेऊन दिलं.

आस करता करता वर्स गेलं. येका राती म्हाराज सपनात आले. सकाळी गाडी धून पम्पावर आलो. डोसक्यात रातीच सपान होत. पम्पवाल्या मालकाला म्हटलं ही बाजूची थोडी जागा देतोस का? भाडा दीन. तो न्हाय व्हय करीत व्हता. पन म्हाराजांवर आपला ईस्वास. शेवटी व्हय म्हणाला. त्या सायबाकडून थोडं पैस घेतलं आनि पम्पाच्या बाजूला सरवीस सेंटार टाक्ल. सिवजयंतीला थाटात ऊदघाटन केलं. आपला गुरु लय खुश झाला. बोल्ला छत्रपतींनी सोळाव्या वर्सी  सोराज्याची स्थापना केली तू सोळाव्या वर्सी तुजा सरवीस सेंटार टाकलास. आपल्याला जाम आनंद झाला.

हातात चहाची किटली घेऊन प्लॅटफॉर्मवर फिरणार्‍या एका मुलाला त्याने हाक मारली.

ये, दोन चा दे रे.

ये बाबा, मला नको चहा. मी पित नाही.

चा नाय पित?’
नाही

येक कप प्या सायब, मी देतोय.

अरे खरच नाही पित.

तो जाऊन तोंडातला मावा ट्रॅकवर थुकून आला. तो पर्यन्त चहावाल्याने एक कप भरला होता.

त्याने खिशातून नोटांच एक छोटं पुडक काढलं त्यातून दहाची नोट त्याने चहावाल्याला दिली, तेव्हा मी पहिलं त्याच्या तीन बोटात सोन्याच्या आंगठ्या होत्या. गळ्यातली चेन मघाशी पाहिलीच होती.

त्याने चहाचा कप तोंडाला लावला आणि तोंड आंबट केलं.

थू तुझ्या आयला, हा काय चा हाय का?’

तो चहावाला पोरगा तोपर्यंत निघून गेला होता.

हे साले अशी मादरचोदगिरी करतात. म्हाराजांनी आपल्याला शिकावलय चोरी नाय करायची कुनाची. जे काय असल ते इमानान करायचं. म्हनून तर आज पुन्यात दोन सरवीस सेंटार हाईत आपली.   

चहाचा रिकामा प्लास्टिकचा कप बाजूच्या कचऱ्याच्या कुंडीकडे भिरकावून त्याने खिशातून एक ट्यूब काढली.

ह्ये बघा पायाची काय वाट लागलीय. त्याने जिन वर करून पाय दाखवले.

दोन्ही पावलांवर जखमांचे चट्टे पडलेले.

ह्ये आस गाडी धुवायच्या केमिकलनी होतय, पर बेयमानी न्हाय केली कदी. 
तो त्या ट्यूब मधलं मलम पायाला लावीत म्हणाला.  

राहतोस कुठे?’

हडप्सरला. भाड्याच घर आहे, दोन खोल्यांच. साला मालक दरवर्षी हजार रुपये भाडं वाढवतो, म्हटलं जाव दे, तुला काय वाढवायच ते वाढव, पन जागा सोडनार नाय. आता सा हजार देतो म्हैन्याला.

सहा हजार? इतक काय आहे त्या जागेत?  

म्हाराज हायत त्या जागेत.

कोण? छत्रपती?’

हा मग, म्हाराजांचा पुतळा हाय खोलीत. उभा. खर्‍या मान्सावानी.

काय म्हणतोस?’

हा मग? ते बघत र्‍हातात सगळं

आता तो थोडासा सेंटीमेंटल झाला.

दोन तीन क्षण असेच गेले, मग अचानक उसळून म्हणाला,

भांचोद मर्डरच करून टाकला असता आपन त्यावेळी.

मी म्हटलं अचानक याला काय झालं?

काय झालं? कुणाचा मर्डर?’

त्ये नाय का पुन्यात मध्ये एक प्रकरन झालं होत, एक मर्डर झाला होता.

माझ्या लक्षात आलं.

तीन दिवस भटकत होतो सायेब, कामधंदा सोडून.

पण तुझा काय संबंध, तू होतास की काय त्या ग्रुप मध्ये?’

नाय वो, पन च्यायला आपल्या म्हाराजांना बोलतो म्हणजे काय? खोपडी असली सटकली व्हती ना, त्यावेळी कोनी भेटला असता तर खपवूनच टाकला असता.

त्याचे डोळे आता पेटत होते. 
घरी जायची हिम्मत होत नव्हती सायेब. घरी गेलो की म्हाराज बघत र्‍हायचे. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची ताकद नाय व्हायची. भांचोद म्हाराजांना बोलतात आनि आपन साला झ्याट काय करू शकत नाय? काय जिंदगी हाय ही? शेवटी एक चादर टाकली त्यांच्यावर. मग बरा वाटला.

अरे पण असं कुणालाही मारणं बरोबर आहे काय? महाराजांनी असं केलं का कधी त्यांच्या उभ्या आयुष्यात? त्यांना आवडलं असतं का तू असा कुणातरी निरपराध माणसाला मारला असतास तर?’

नाय ना, मग डोस्क शांत झालं.

दोन क्षण पुन्हा असेच गेले.

त्याच्याकडे एक प्लास्टिकची पिशवी होती. त्यातून त्याने एक एक वस्तु काढायला सुरवात केली. 
मिठाईचा एक पुडा होता. एक साडी होती. दोन छोटे खेळण्यांचे बॉक्स होते.

आता मुम्बैला बापाच्या घरी जातोय. माझा नी त्याचा पटत नाय. पर आय हाय ना. भाव आनी त्याची बायको हाय. भाव बरा हाय पन भावजय लय वंगाळ. आयचा नि तिचा जमत नाय. आयला म्हटलं माझ्याकडे येऊन र्‍हा, तर तिला ते पटत नाय. पन भावाची पोरगी लय गोड हाय. आपला लय जीव तिच्यावर. तिच्यासाठी हयो खाऊ आनि खेळनी घेतली नी आयसाठी साडी. पैश्याच काय वाटत नाय वो आता, पर च्यायला ही भावबंदकी नाय पायजेल. साला ह्या भावबंदकीनेच म्हाराजांच्या सोन्यासारख्या सोराज्याची वाट लावली.
गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती. मघाच पासून सुन्न भासणार्‍या प्लॅटफॉर्मवर अचानक चलबिचल सुरू झाली. आम्ही उठलो. जनरल मध्ये बसायला तरी जागा मिळायला हवी.

झोप तर आता येईलस वाटत नव्हतं.     
  

                         *****

  

           

      

बुधवार, १ जुलै, २०१५

जैतापूरचे काल्का होईल का?





 जर्मनीतल्या आखन शहरात डिकच्या घरात मी आणि फ्रँक आम्ही आपआपल्या लॅपटॉपमध्ये डोकी खुपसून बसलो होतो. अचानक आपल्या लॅपटॉप मधून डोके बाहेर काढीत फ्रँक मला म्हणाला, प्रदीप, व्हाट आर यू डूइंग टूमोरो?’
मी म्हटलं, नथिंग स्पेशल.
शाल वी गो टु काल्का टूमोरो?’ फ्रँकने मला विचारले.
व्हाट इज काल्का?’
ए न्यूक्लियर पॉवर प्लांट. त्याचे निळे डोळे चमकवीत गालात हसत फ्रँक म्हणाला. 
मला नाही म्हणायचे काही कारण नव्हते.   
   
दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमी पेक्षा लवकर ब्रेकफास्ट उरकून मी आणि फ्रँक आम्ही काल्काच्या दिशेने निघालो. आखन ते काल्का साधारण दीडशे किलोमीटरचे अंतर आहे, म्हणजे जेमतेम दीड दोन तास. त्या दिवशी शनिवार होता. रस्त्याला फारस ट्रॅफिक नव्हतं. फ्रँक आरामात गाडी चालवीत होता, दुसरीकडे मला काल्काची गोष्ट सांगत होता .  

काल्काची गोष्ट सुरू होते १९५७ सालापासून. पण त्याआधी आपल्याला जर्मनीतल्या दोन अणुऊर्जा प्रकल्पांची ओळख करून घ्यायला हवी. हॅम्बर्ग शहराच्या वायव्वेला साधारण ४५ किलोमीटर अंतरावर ब्रोकडोर्फ येथे १९६० सालापासून एका लाइट वॉटर रिएक्टरचे बांधकाम सुरळीत सुरू होते. पण १९७३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात तिथे लोकांचा विरोध वाढू लागला. मोठ्या संखेने लोक निदर्शने करू लागले. या निदर्शनाना पार्श्वभूमी होती जर्मनीतल्या दुसर्‍या एका अणुऊर्जा प्रकल्पाची. दक्षिण जर्मनीत फ्रान्सच्या सीमेवर वायल नावाच्या एका गावात एका प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू होते. जमीनधारक शेतकर्‍यांनी जमिनी विकल्याही होत्या, मात्र आसपासच्या प्रदेशात वाईनसाठी द्राक्ष पिकवणार्‍या शेतकर्‍यांनी या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या उष्णतेचा द्राक्ष्यांवर परिणाम होईल म्हणून आंदोलन सुरू केले आणि तिथल्या राज्य सरकारने भूसंपादन झालेले असतानाही वायलचा तो प्रकल्प रद्द केला. या आंदोलनाच्या विजयातून स्फूर्ति घेऊन ब्रोकडोर्फ येथे आंदोलन सुरू झाले. पाहता पाहता या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आणि १९७६ साली तर आंदोलक आणि पोलिस यांच्यात यादवी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली.  जर्मनीच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी पोलिस कारवाई होती. एकाच वेळी तीस हजाराहून अधिक जर्मन रस्त्यावर उतरले होते. जर्मनीची एकंदर लोकसंख्या पाहता हा आकडा किती तरी मोठा होता. शेवटी १९७७च्या ऑक्टोबर महिन्यात ब्रोकडोर्फचे काम थांबले. जर्मन अणु विरोधी चळवळीचा हा दूसरा मोठा विजय होता.

दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनीने अणुऊर्जेचा उघड स्वीकार केलेला होता. मात्र युरेनियमचा मर्यादित साठा पाहता भविष्यात युरेनियमची टंचाई भासू शकते हे लक्षात घेऊन जर्मनीने १९५७ सालापासूनच प्लूटोनियमवर आधारलेल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरच्या संशोधनावर भर दिला होता.  शेवटी जर्मनी, बेल्जियम आणि नेदरर्लंड या देशांनी मिळून जर्मनीच्या वायव्य सीमेवरील काल्का गावात एका ३०० मेगावॅट फास्ट ब्रीडर न्यूक्लियर रिएक्टरच्या बांधकामाला सुरुवात केली. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक यूनियन या पक्षाने आपली मजबूत पकड असलेल्या काल्का गावाच्या परिसराची या प्रकल्पासाठी निवड केली. शेतकर्‍यांना भरपूर मोबदला देऊन जमीन खरेदी करण्यात आली. आपल्या राजकीय पक्षाने आपले भले केले म्हणून शेतकरी खुष  झाले. त्यांनी भरभरून मते दिली, १९५९ सालच्या निवडणुकीत सी. डी. यू. सत्तेवर आली. प्रकल्पाचे बांधकाम सुरळीत सुरू होते. मात्र या प्रकल्पाची, खास करून फास्ट ब्रीडर रिएक्टरची घातकता लक्षात घेऊन नेदरर्लंडमधल्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता, नेदरर्लंड मधले राजकीय पक्ष आमचा अणुउर्जेला विरोध नाही पण काल्काला आहे अशी भूमिका घेऊन या आंदोलनात उतरले. त्याच वेळी नेदरर्लंड सरकारने वीजदरात ३ टक्के वाढ केली आणि विरोध आणखीनच वाढला. त्यात १९७९ साली अमेरिकेत थ्री माइल आयलंड मधल्या अणुप्रकल्पात अपघात झाला आणि त्याचे जोरदार पडसाद जर्मनीत उमटले. जर्मनीत सर्वत्र अणुऊर्जेच्या विरोधात संतापाची लाट उसळली यात काल्का गावातले शेतकरी ज्यांनी जमिनीचे पैसे घेतले होते तेही सामील झाले. तरीही जर्मन सरकारने विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे बांधकाम सुरूच ठेवले.

फ्रँकची गाडी आता हायवेवर धावत होती. काल्काचे फलक दिसू लागले होते. आता आणखी अर्ध्या तासात आम्ही काल्काला पोहचू.  फ्रँक काल्काची गोष्ट उत्साहाने सांगत होता. त्याने स्वत: त्या आंदोलनात भाग घेतलेला होता. फ्रँक भूतकाळात रमला होता आणि मी लक्ष देऊन ऐकत होतो.
   
वीस वर्षे इथल्या लोकांनी प्रचंड मोठा लढा उभारला. जर्मनीतून ठिकठिकाणाहून आम्ही कार्यकर्ते आपल्या गाड्या, भाड्याच्या बस, रेल्वे अशा जमेल त्या वाहनाने सात आठशे किलोमीटरचे अंतर पार करून काल्कात येत असू. प्रचंड पोलिस बंदोबस्त रस्त्या रस्त्यावर तैनात केलेला असे. आमच्या बसेस सात आठ वेळा तपासल्या जात. सायकल चालवताना घालायची हेल्मेट शस्त्र म्हणून पोलिसांनी जप्त केली. प्रवासात वेळ जावा म्हणून काही महिला कार्यकर्त्या स्वेटर विणत, त्यांच्या क्रोशाच्या सुयासुद्धा पोलिसांनी शस्त्र म्हणून जप्त केल्या, प्रवासात खायला म्हणून घरून आणलेली उकडलेली अंडी सुद्धा लोक फेकून मारतील म्हणून जप्त केली गेली. पोलिसी कारवाईचा अतिरेक झाला होता. ठिकठिकाणी लाठीमार होई, पाण्याच्या तोफांचा सर्रास वापर होत असे. तरीही लोकांनी लढा सुरू ठेवला. जर्मन सरकारने एकीकडे प्रकल्पाचे बांधकामही रेटून नेत सुरूच ठेवले होते. इ. स. १९८५ साली प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले. पंधरा ते वीस कोटी डॉलर किंमतीचा, फक्त एका अणुभट्टीचा, केवळ ३०० मेगावॅटचा हा प्रकल्प पूर्ण होई पर्यन्त ४०० कोटी डॉलर, म्हणजे साधारण २५ हजार कोटी रुपये खर्च झाले होते. किंमत वीस पट वाढली होती आणि प्रकल्प पूर्ण व्हायला पंचवीस वर्षे लागली होती. १९८५ साली अणुभट्टीत इंधन म्हणून साडे बाराशे किलो किलो प्लूटोनियम आणि कुलंट म्हणून सोडीयम भरण्यात आले. आता फक्त रिएक्टर सुरू करणे बाकी होते आणि १९८६ साली चेर्नोबिलची दुर्घटना घडली. पुन्हा विरोध प्रचंड वाढला. १९९१ सालापर्यंत लोकांनी सरकारला प्रकल्प सुरू करण्यापासून रोखले होते. मध्यंतरीच्या काळात प्रस्थापित राजकीय पक्षांच त्या प्रदेशातून उच्चाटन झालं आणि ग्रीन पार्टीचे उमेदवार निवडून आले. शेवटी १९९१ सालच्या मार्च महिन्यात जर्मनीतल्या  नोर्दर्‍हाइन वेस्टफालेन प्रांताच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले.  शंभर टक्के बांधून पूर्ण झालेला, इंधन भरलेला अणुप्रकल्प रद्द होण्याची ही जगातली पहिलीच वेळ होती. या प्रकल्पाच्या शेवटाबरोबरच फास्ट ब्रीडर रिएक्टरचाही युरोप मध्ये अंत झाला. आता जर्मन सरकारने या अणु प्रकल्पाचं मुलांच्या उद्द्यानात रूपांतर केले आहे. आता त्याचे नाव आहे काल्का वंडरलँड.     

आम्ही आता काल्का गावात येऊन पोहोचलो होतो. एक दोन ठिकाणी रस्ते चुकत शेवटी काल्का वंडरलँड अशी पाटी पहिली आणि सरळ मुख्य रस्त्याने पुढे निघालो. एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर या वंडरलँडच मोठ्ठं प्रवेशद्वार लागलं. फ्रँकने समोरच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क केली. प्रवेशद्वाराबाहेरच्या भल्या मोठ्ठ्या प्रांगणात मोठा बाजार भरला होता. त्या बाजारात एक फेरफटका मारून आम्ही आत गेलो. तिकीट होते २७ युरो म्हणजे आपले दोन हजार रुपये. आत अनेक राईड्स होत्या. दोन तीन मोठी रेस्टोरंट्स होती. या खेरीज छोटे मोठे खाण्यापिण्याचे, भेटवस्तूंचे अनेक स्टॉल्स होते. याखेरीज राहण्याची सोय असलेले एक मोठे हॉटेल आत होते. अणुभट्टीत थंडाव्यासाठी या प्रकल्पाच्या मागून वाहणार्‍या ज्या र्‍हाइन नदीतून पाणी घेतले जाणार होते त्या नदीच्या काठावर लोक कॉफी पित बसले होते. काही जण त्या नदीत गळ टाकून मासेमारी करीत होते. हे सगळं त्या वंडरलँडच्या खेळाचाच एक भाग होता. ज्या कुलिंग टॉवर मध्ये गरम पाणी थंड करण्यात येणार होते त्या कुलिंग टॉवरच्या आत बरोबर मध्यावर एक मोठा यांत्रिक झोपाळा उभारलेला होता. झटक्यात तो वर जात असे आणि त्या भव्य कुलिंग टॉवरच्याही वर जाऊन गरगर फिरत असे आणि त्याबरोबर त्याला टांगलेली माणसे कुलिंग टॉवरच्यावर फिरत होती. कुलिंग टॉवरच्या बाहेरच्या भिंतीचे कृत्रिम प्रस्तरारोहनाच्या भिंतीत रूपांतर केले होते. त्यावर तरुण मुलं वॉल क्लाईंबिंगचा  खेळ खेळत होती. कुलिंग टॉवरच्या खालच्या बाजूत जिथे अणुभट्टीतून येणारे पाणी थंड करण्यापूर्वी साठवले जाणार होते त्या पाण्यात लहान मुले छोट्या छोट्या रबरी होड्या घेऊन डुंबत होती. असा सगळा आनंदोत्सव सगळीकडे चालला होता.
मी तिथल्या इन्फॉर्मेशन काऊंटरवर चौकशी केली.
साधारण किती माणसे इथे काम करतात?’
हॉटेल, रेस्टोरंट, सगळ्या राईड, अॅडमिनिस्ट्रेटिव स्टाफ आणि सफाई कर्मचारी वगैरे धरून हजारच्या आसपास माणसे काम करीत असतील.
रोज किती लोक भेट देतात या उद्यानाला?’
सरासरी दिवसाला साडे तीन हजार लोक भेट देतात.
मी मनात आकडेमोड करू लागलो १९९१ ते २०१५ म्हणजे २४ वर्षे, गुणिले ३६५ दिवस आणि त्याला गुणिले साडे तीन हजार आणि त्या प्रत्येकाचे दोन हजार रुपये म्हणजे किती झाले? जाऊदे म्हणून सोडून दिले. बहुदा २५ हजार कोटी रुपये एव्हाना वसूल झाले असतील.   

येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं लागली होती. त्या शेतामध्ये शेतकर्‍यांनी पवनचक्क्याना जागा दिली आहे. कुठल्याही नुकसानीखेरीज त्या जागांचे वर्षाचे भाडे ही शेतकर्‍यांसाठी वरकमाई आहे. त्याखेरीज आपल्या घराच्या छपरावर, गोठ्यांवर, गोदामांवर सोलार पॅनल लावून त्याची वीज ते मोफत वापरतायत आणि उरलेली वीज वीज कंपनीला विकतात. दर वीकएंडला दोन दिवस या वंडरलँडच्या बाहेर बाजार भरतो. तिथे हे आजूबाजूच्या गावातले शेतकरी जगभरातून येणार्‍या पर्यटकांना घरी  बनवलेले पाव, जाम, चीज, लोणी, नदीतले मासे या खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते कलात्मक भेटवस्तूंपर्यंत काय काय विकत असतात. याखेरीज हजारभर स्थानिकांना हे अणु-उदद्यान थेट रोजगार देते आहे.  आज काल्का वंडरलँड हे २५ हजार कोटी रुपये खर्च केलेले जगातले सगळ्यात महागडे लहान मुलांच्या खेळाचे उद्यान आहे. हे जर्मनीच्या अणुविरोधी चळवळीचे विजयस्थळ आहे. फुकुशिमानंतर जर्मनीने अणुऊर्जेचा उघड त्याग केला असला तरी त्याची बीजे काल्का, वायल, ब्रोकडोर्फ मध्ये पंचवीस तीस वर्षांपूर्वी इथल्या सामान्य शेतकर्‍यांनी रुजवली होती.

माझ्या मनात विचार आला, आज जैतापूरची परिस्थिति काही वेगळी नाही. विरोध अणुउर्जेला नाही    जैतापूर प्रकल्पाला आहे अशी काहीशी संदिग्ध भूमिका घेतलेले राजकीय पक्ष काल्काप्रमाणे याही आंदोलनात आहेत. इथेही प्रस्थापित राजकीय पक्षांना जैतापूरकरांनी धुडकावून लावले आहे.   काल्काप्रमाणे इथेही शेतकर्‍यांनी जमिनीचे पैसे घेतले आहेत. काल्कात चेर्नोबिल नंतर विरोध वाढला इथे फुकुशिमा नंतर आंदोलनाचा जोर वाढला. तिथेही तिथल्या सरकारने विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे काम सुरू ठेवले, प्रकल्प पूर्णही केला. इथेही कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प पूर्ण करूच अशा वल्गना सत्ताधारी पक्ष करीतच असतात. मात्र कमतरता आहे ती सकारात्मक इच्छाशक्तीची. जैतापुरात आज केवळ एक भिंत बांधली गेली तर, आता प्रकल्प होणारच, शेतकर्‍यांनी पैसे घेतले आता विरोध करून काय फायदा असा आत्मघातकी नकारात्मक विचार करणार्‍या कोकणी माणसाने जर्मनीतल्या या  काल्का वंडरलँडपासून धडा घ्यायला हवालोकशाहीत शेवटी विजय लोकांचाच होतो, व्हायलाच हवा.

*****