सोमवार, १ जुलै, २०१३

सोईच ज्ञान आणि गैरसोयीच अज्ञान


दि. १७ मे रोजी दै. लोकसततेतील गल्लत, गफलत, गहजब या सदरात राजीव सानेंचा एक लेख प्रसिद्ध झाला होता चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा’.

या लेखात सानेंनी गैरसमजुतीतून काही विधाने केली होती ज्यांचा प्रतिवाद करणे गरजेचे होते. येलो ऑस्करसाठी हाय पावरच्या शो साठी ब्रझिलला जाण्याची गडबड असतानाही गैरप्रचाराचे अणु लेख शेवटच्या क्षणी लोकसत्तेला पाठवला, जो लोकसत्तेने दि. २३ मे रोजी प्रसिद्ध केला.

या लेखाला उत्तर म्हणून एनपीसीआयएलचे कार्यकारी संचालक श्री. शशिकांत धारणे यांचा गैरप्रचार की अज्ञान हा लेख दि. १४ जून रोजी लोकसत्तेत प्रसिद्ध झाला.

या लेखाचा प्रतिवाद मी तात्काळ एक लेख लिहून केला होता, परंतु तो लेख अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, यापुढे तो प्रसिद्ध होईल याची आता आशा वाटत नाही म्हणून तो अप्रकाशित लेख इथे प्रसिद्ध करीत आहे.


सोईच ज्ञान आणि गैरसोयीच अज्ञान


   
श्री. राजीव साने हे विविध विषयांवर लिहिणारे एक व्यासंगी पत्रकार आहेत, त्यामुळे दि. १७ मेच्या लोकसत्तेत राजीव सानेंनी अणुउर्जेचं समर्थन करताना जी बेधडक विधाने केली त्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल, परंतु त्याचे समर्थन करण्यासाठी माझ्या दि. २२ मे रोजीच्या अंकातील ‘गैरप्रचाराचे अणु’ या लेखावर छोटीशी टिप्पणी लिहिताना एन.पी.सी.आय.एल.चे कार्यकारी संचालक या वरिष्ठ पदावर काम करीत असलेल्या शशिकांत धारणे यांनी जी विधाने केली आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजीव सानेंनी सर्वसामान्य वाचकांप्रमाणे (बहुदा) एन.पी.सी.आय.एल.च्या पुस्तिकावाचून ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ला नैसर्गिक किरणोत्सार म्हणणे समजण्यासारखे आहे, परंतु धारणेसाहेब सुद्धा साळसूदपणे याचे समर्थन करतात हे पाहून खेद वाटला. आज बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणून जे काही मोजले जाते त्यात नैसर्गिक किरणोत्साराबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम किरणोत्सारही मोजला जातो. विजेचा शोध लागल्यानंतर मानवाने विविध प्रकारची कृत्रिम किरणे, लहरी निर्माण केल्या. अनेक प्रकारची किरणोत्सरी वैद्यकीय उपकरणे निर्माण केली या सगळ्याचे मोजमाप बॅकग्राऊंड रेडिएशन मध्ये होत असते आणि या बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये मानवनिर्मित किरणोत्साराचा वाटा जवळजवळ निम्मा असतो, ज्याची यादी खुद्द धारणेंनीच दिलेली आहे. आजच्या मानवाला सर्वसाधारणपणे जो किरणोत्सार मिळतो त्यातला साधारण १२ टक्के किरणोत्सार हा वैद्यकीय उपकरणातून मिळत असतो. याखेरीज मानवनिर्मित औद्योगिक किरणोत्सार आहे. परंतु या सगळ्याला आपले अणु शास्त्रज्ञ हळूच नैसर्गिक किरणोत्सार म्हणून मोकळे होतात.

आता या मानवनिर्मित किरणोत्साराखेरीज जो ‘आजचा’ नैसर्गिक किरणोत्सार उरतो तो तरी खरा नैसर्गिक किरणोत्सार आहे का? आजवर या पृथ्वीवर झालेले दोन अणुस्फोट आणि गेल्या पन्नास साठ वर्षात शेकड्यांनी अणु चाचण्या करून जी विविध नवनवी किरणोत्सारी मूलद्रव्ये या शास्त्रज्ञांनी वातावरणात सोडली, आज जगभरातील सव्वाचारशे अणु वीज केंद्रातून होणार्‍या गळतीतून, आण्विक प्रदूषणातून आणि अणु कचर्‍यातून जी किरणोत्सारी मूलद्रव्ये वातावरणात मिसळली गेली त्यांनाही आता आपण ‘नैसर्गिक’ म्हणायचे काय? मानवनिर्मित किरणोत्साराबरोबरच या अमानवी किरणोत्सारालाही जर ‘नैसर्गिक’ म्हणायचे तर मुळात अणु विज्ञानात ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ अशी संज्ञा करणार्‍याला ‘नॅचरल रेडिएशन’ म्हणता आले असते. पण कुणाचे लक्ष नाही असे पाहून आपले शास्त्रज्ञ हळूच बॅकग्राऊंड रेडिएशनला नैसर्गिक किरणोत्सार, रेप्रोसेसिंगला रीसायकलिंग आणि अणु उर्जेला अक्षय ऊर्जाही म्हणू लागले आहेत.
या सगळ्याचा विचार करता 'आयोनायिझग किरणोत्सार फक्त अणुभट्टीत निर्माण होत असतो. नैसर्गिक किरणोत्सारात ही क्षमता नसते'. हे माझे वाक्य धारणेसाहेबांना चुकीचे वाटणे साहजिकच आहे. आता जर खर्‍या नैसर्गिक किरणोत्साराचे मोजमाप करायचे तर आपल्याला त्या काळात जावे लागेल जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता, जेव्हा वातावरणाच्या कवचाला तडे गेले नव्हते, लोक विमानात बसून उडत नव्हते, पृथ्वीच्या पोटात असलेले यूरेनीयम पृष्ठभागावर आले नव्हते किंबहुना यूरेनीयम म्हणजे काय हेच माहीत नव्हते त्या काळाचा विचार केला तर तेव्हा निसर्गात मुख्यत्वे दोनच किरणोत्सर्गी मूलद्रव्ये होती यूरेनीयम आणि थोरीयम आणि त्यांची काही डॉटर प्रॉडक्टस जसे रेडियम इ. आणि त्यापासून निघणारा रेडॉन नावाचा किरणोत्सर्गी वायु ज्यांच्या किरणोत्सारामध्ये मध्ये आयोनायजिंग करण्याची क्षमता होती, हे मी माझ्या लेखातही नाकारलेले नाही किंबहुना पुढच्याच वाक्यात मी एका चमत्कारिक नैसर्गिक अणु भट्टीचे उदाहरण दिले आहे. या खेरीज बीटा कण आणि गामा किरणांचे उत्सर्जन करणारे काही कण यांचा सौर वर्षाव होत होता जो वातावरणाचे अखंड कवच मोठ्या प्रमाणात अडवीत होता. मात्र प्रचंड व्याप्ती आणि मात्रा असलेल्या ‘सूर्यप्रकाश’ या नैसर्गिक नॉनआयोनिजिंग किरणोत्साराशी तुलना करता तेव्हाचा नैसर्गिक आयोनायजिंग किरणोत्सार नगण्यच मानावा लागेल. तरीही जगात काही ठिकाणी जसे ब्रझिल किंवा भारतातील केरळ, जादुगुडा येथे (तेथे असलेल्या यूरेनीयम थोरीयमच्या साठ्यांमुळे) स्थानिक पातळीवरील नैसर्गिक बॅकग्राऊंड आयोनायजिंग रेडिएशन जास्त होते.

आता नैसर्गिक, अनैसर्गिक त्यात पुन्हा आयोनायजिंग आणि नॉनआयोनायजिंग किरणोत्सार या सगळ्याने आपण भंडावून गेला असाल, तर इतकेच लक्षात घ्या की किरणोत्सार हा निसर्गात असतोच. किरणोत्साराखेरीज जीवसृष्टीची कल्पना करता येणार नाही. किरणोत्सार हा ऊर्जा वाहक आहे जी जीवसृष्टीस आवश्यक आहे. ती ऊर्जा धारणेंनी सांगितल्याप्रमाणे ग्रे या एककात मोजली जाते, मात्र या किरणोत्सारात त्याच्या ऊर्जावाहकतेनुसार कमी धोकादायक आणि अतिधोकादायक असा भेद होतो. किरणोत्सारामध्ये आयोनायजिंग करण्याची क्षमता असणे हे त्याचे धोकादायक असण्याचे एक लक्षण आहे आणि हे लक्षण त्या किरणांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. आता सजीवसृष्टीस यातून नेमका धोका काय आहे? काही ठिकाणी बॅकग्राऊंड रेडिएशन जास्त, तेही आयोनायजिंग स्वरूपाचे असून सुद्धा तिथे वर्षानुवर्षे माणसे कशी जगली? यूरेनीयम, पोटॅशियम आणि कार्बनसारखी किरणोत्सारी मूलद्रव्ये आपल्या शरीरात असूनही आपल्याला काहीच कसे होत नाही? आणि असे सगळं आलबेल असताना काही मूर्ख माणसे अणु प्रकल्पांना मात्र विरोध का करतात? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.

याच साध उत्तर असं आहे की, निसर्गात आयोनायजिंग किरणोत्सार करू शकणारे मुख्यत्वे तीन घटक असतात. अल्फा, बीटा कण आणि गामा किरणे. यापैकी जो किरणोत्सार मोजला जातो तो मुख्यत्वे गामा किरणांचा असतो, कारण पृथ्वीच्या पोटात असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्यातील अल्फा कण शोधणे ही कठीण असते तर ते मोजणे तर दूरच, कारण अल्फा कण पातळ कागदाचा अडथळा सुद्धा पार करू शकत नाहीत, समझा अडथळा नसला तरी ते चार सेंटीमीटर हवेचा स्तंभसुद्धा पार करत नाहीत त्यामुळे ते मापन यंत्राच्या संवेदकापर्यन्त पोहचतही नाहीत. त्यामुळे त्याच्या बरोबरीने होणार्‍या इतर किरणोत्साराशी त्याची सांगड घालून त्याचे अंदाजे मोजमाप केले जाते. त्यामुळे जो मोजला जातो आणि जो आयोनायजिंग स्वरूपाचा असतो तो मुख्यत्वे गामा किरणोत्सार असतो. हा किरणोत्सार धारणे म्हणतात त्या प्रमाणे सर्वत्र अगदी तुमच्या घरादारातून पार होत तुमच्या पर्यन्त पोहोचत असतो. ही किरणे अगदी तुमच्या शरीरतूनही पार होतात. ती पार होत असताना आयोनायजिंग ही घडवत असतात आणि गेली कोट्यावधी वर्षे हा किरणोत्सार सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणारच आहे. खरी गोम यातच आहे. हा किरणोत्सार आयोनायजेशन घडवतो म्हणजे त्या किरणांमधील ऊर्जा अणूमधील एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेतून बाहेर फेकते. मानवावर किंवा एकंदरीत सजीव सृष्टीवर हा किरणोत्सार या उर्जेमुळे जो प्रभाव पाडतो, आणि आयोनायजेशन घडवतो तो त्या साजिवातील अतिसूक्ष्म पेशींमध्ये घडवित असतो. त्यामुळे पेशी मरत असतात. या मेलेल्या पेशींची संख्या पुन्हा भरून काढण्याची एक यंत्रणा आपल्या शरीरात असते आणि ती यंत्रणा सजीवांच्या उत्क्रांती बरोबरच विकसित झालेली असल्याने त्यात या किरणोत्साराने मरणार्‍या पेशींच्या संखेचाही समावेश असतो. कारण हा सर्वसाधारण नैसर्गिक किरणोत्सार गेली कोट्यावधी वर्षे निसर्गात आहे आणि सजीवांच्या उत्क्रांतीत त्याच मोठं योगदान आहे. मात्र मानवाला यूरेनीयमचा शोध लागल्यापासून आजवर अणु विज्ञान आणि तंत्रज्ञानात जो विकास झाला त्याने भूगर्भात खोलवर खडकांमध्ये दडलेले यूरेनीयम वर काढले गेले. त्याचे अणु फोडून त्यातून अनेक वेगवेगळी नवीन उच्च किरणोत्सारी मूलद्रव्ये तयार केली गेली, नवे किरणोत्सारी वायु निर्माण झाले. हे सगळं फक्त अणुभट्टीतच निर्माण होऊ शकतं. मुळ निसर्गात ते नव्हते. अणुस्फोट, अणु चाचण्या, अणु अपघात, अणु कचरा यातून ही नवी किरणोत्सारी मूलद्रव्ये निसर्गात उघड्यावर आली. त्यामुळे ती आता थेट तुमच्या माझ्या शरीरात जाण्याची भीती निर्माण झाली, किंबहुना ती एव्हाना गेली ही असतील. अणु प्रकल्पाशेजारी राहणार्‍या लोकांना सगळ्यात जास्त धोका या आण्विक प्रदूषणाचा आहे. कारण बॅकग्राऊंड किरणोत्सार म्हणून जो मोजला जातो तो किरणोत्सार मुख्यत्वे बाहेरून तुमच्या शरीरावर प्रभाव टाकत असतो, परंतु हे आण्विक प्रदूषण ज्यात अल्फा कणांचा मोठा वाटा असतो आणि ह्या अल्फा कणांची आयोनाजिंग क्षमता तीव्र समजल्या जाणार्‍या गामा किरणांपेक्षा वीस पट अधिक असते, असे कण प्रक्षेपित करणारी प्लूटोनियम सारखी नवनवी मूलद्रव्ये जेव्हा थेट मानवाच्या शरीरात जातात तेव्हा हे अतितीव्र किरणोत्सारी कण तुमच्या माझ्या शरीरातील संवेदनशील अवयवांच्या थेट संपर्कात येतात आणि तेथे आपला प्रभाव टाकतात. ही मूलद्रव्ये, हा किरणोत्सार या जीवसृष्टीला नवा आहे, अनोळखी आहे. आपले शरीर ही नवी किरणोत्सारी मूलद्रव्ये, हा किरणोत्सार ओळखू शकत नाही. मात्र हा किरणोत्सार स्थानिक पातळीवर प्रचंड परिणाम करू शकतो. या परिणामाने मेलेल्या पेशी पुन्हा निर्माण करण्याची क्षमता प्रत्येकाच्या शरीरात असेलच असे नाही. यातून मग वेगवेगळे विकार निर्माण होतात.

नैसर्गिक किरणोत्सार म्हणून मानवनिर्मित किरणोत्सारही मोजायचा आणि त्याचे मोठमोठे आकडे समोर मांडायचे आणि त्या तुलनेत आमचा किरणोत्सार किती कमी? असे भासवायचे, हे म्हणजे आपली रेषा छोटी करण्यासाठी बाजूला एक मोठी रेषा काढण्यासारखे आहे.

आता अपघातांबाबत. कोणताही अपघात झाल्यावर एक प्रश्न सहज विचारला जातो, “किती माणसं मेली?” हा अत्यंत भावनिक प्रश्न आहे. आपण इथे काही शास्त्रीय चर्चा करतोय. छोट्या मोठ्या औध्योगिक अपघातांचे परिमाण अणु अपघातला लागू शकत नाहीत. त्यात फुकुशिमासारखा अपघात हा अपघात नव्हे उत्पाद आहे, डिझास्टर आहे. किती मनुष्यबळ वाया गेले हा निकष त्याला कसा लावणार? फुकुशिमा चेर्नोबिल तर दूर पण भोपाळचा अपघात आपल्या समोर झाला त्याचे मनुष्यबळ कसे काढणार? अणु तंत्रज्ञानात अणु भट्टी वितळणे ही अणु अपघाताची सर्वात वरची पायरी आहे त्यात माणसे मेली की नाही हा निकषच नाही. “व्यवस्थापनाने आणि जपानी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करून अनर्थ टाळला.” या वाक्यातच धारणेंनी योग्य उत्तर दिले आहे. जर तसे केले नसते तर काय ‘अनर्थ’ घडला असता याची पूर्ण कल्पना धारणेना आहे.

आता राहिला मुद्दा डॉ. अनिल काकोडकरांवरील आरोपांचा. डॉ. काकोडकर हे भारताचे श्रेष्ठ अणु शास्त्रज्ञ आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा आणि अधिकाराचा मला आदरच आहे. परंतु त्यांना प्रतिप्रश्न करायचाच नाही, त्यांच्यावर टीका करायचीच नाही, ते जे म्हणतील ते ब्रह्मवाक्य समजायचे ही अंधश्रद्धा झाली. मी डॉ. काकोडकरांबाबत जे विधान केले त्याचा संदर्भ राजीव सानेंच्या मुळ लेखातूनच घेतलेला आहे. ज्या पॅसिव्ह सिस्टमचा उल्लेख धारणे करतात ती पॅसिव्ह सिस्टम जगभर किती ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली, जगभर इतरत्र तर सोडाच पण ज्या प्रकल्पाच प्रमुखपद धारणे भूषवितात त्या जैतापूर प्रकल्पात तिचा अंतर्भाव आहे का आणि तिला किती खर्च येणार आहे याची माहिती त्यांनी द्यायला हवी होती. यापुढील युगात अणु प्रकल्पांच अर्थकारण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे किंबहुना अणुपर्वाची ती मृत्यूघंटाच आहे, कारण सौर ऊर्जा झपाट्याने स्वस्त होतेय. तेव्हा आता एन.पी.सी.आय.एल.ने आपल्या पुस्तिकामध्ये बदल करावा किंवा करू नये परंतु किमान इथून पुढे बॅकग्राऊंड रेडिएशनला नैसर्गिक किरणोत्सार तरी म्हणू नये.
_____________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा