रविवार, २२ डिसेंबर, २०१३

समाज घडवणार्‍या इमारती आणि इमारती पाडणारा समाज



हेरिटेज की हॅरॅसमेंट  हा संदीप आचार्य यांचा लेख  दि. ८ डिसेंबर रोजीच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झाला होता. या लेखाला दिलेले उत्तर लोकसत्तेने अद्याप प्रसिद्ध न केल्याने इथे प्रसिद्ध करीत आहे. 

रिचर्ड निकेल या अमेरिकन इतिहासकाराने एके ठिकाणी म्हटले आहे, महान वास्तूंना दोनच नैसर्गिक शत्रू असतात, एक म्हणजे पाणी आणि दूसरा मूर्ख माणसे.

                        रविवार दि. ८ डिसेंबरच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या हेरिटेज की हॅरॅसमेंट या लेखात कुणी बीडीडी चाळीतला तरुण बीडीडी चाळीत सार्वजनिक संडास असल्याबद्धल संताप व्यक्त करतो, त्यामुळे त्याच लग्न अडलय, पण बीडीडी चाळी बांधल्यापासून तिथे सार्वजनिक संडासच होते मग आता पर्यन्त बीडीडी चाळीत लग्नचं झाली नाहीत की काय? आणि संडास दुरुस्त करायला हेरिटेजचा अडथळा आहे काय? बीडीडी चाळीत राहणार्‍यांना संडास दुरुस्त करता येत नाहीत मात्र आपल्या खोल्या वाढविण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळयांचे पिंजरे लावून सगळ्या बीडीडी चाळीचे मानव संग्रहालय मात्र करता येतं ! या बीडीडी चाळीतल्या अनेकांनी विरार, वांगणी कडे एक दोन फ्लॅट घेऊन ठेवलेले आहेत, तरीही बीडीडी चाळीतली खोली ते सोडायला तयार नाहीत कारण त्यांना समोर टॉवर दिसतो आहे. त्यामुळे त्या दहा बाय बाराच्या खोलीचे आपण मालकच असल्याच्या थाटात ते आपली कैफियत मांडून सहानुभूती मिळवताहेत. 

                        हेरिटेज यादीतल्या इमारती ह्या जुन्याच असणार हे काही वेगळं सांगायला नकोय. पण इमारत जुनी असली तरी ती मोडकळीला आली ती वर्षानुवर्षे तिची डागडुजी न केल्यामुळे आणि अशी डागडुजी आणि रंगकाम सातत्याने करायला हवे आणि ती जबाबदारी त्या इमारतीत राहणार्‍यांची किंवा मालकाची आहे, असे मुंबईचा प्रांतिक अधिनियम सांगतो. त्यामुळे हेरिटेज इमारतीच्या डागडुजीवर खर्च कुणी करायचा याचे वेगळे उत्तर द्यायची गरज नाही. आधी इमारत मोडकळीस आणायची आणि मग एफएसआय वाढवून घ्यायचा हीच जुनी खेळी हेरिटेज इमारतींतही खेळली जातेय आणि त्याला आधार दिला जातोय तो पुन:र्विकासाच्या हक्काचा. पण हा हक्क सांगताना किमान वास्तु वारसा असलेल्या घरमालकांनी डागडुजीची जबाबदारी आता पर्यन्त का पार पाडली नाही, याचे काय उत्तर आहे त्यांच्याकडे? हेरिटेजच्या निकषाबद्दल मतभेद असू शकतात पण हेरिटेज नकोच ही भूमिका हा समाज कसा घेऊ शकतो?

                        मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईचा चटई क्षेत्र निर्देशांक निश्चित करायला हवा असा एक नावाच शोध या लेखाच्या लेखकाने लावला आहे. मुळात मुंबईची लोकसंख्या वाढली म्हणजे तेव्हाच्या मूळ मुंबईतल्या लोकांना अचानक जास्त मुले होऊ लागली की काय? बाहेरून येणारे लोंढे इथले सरकार आणि सरकार चालविणारे राजकरणी रोखू शकले नाहीत हे सत्य सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचा भार एफएसआय वर कशासाठी? चटई क्षेत्र निर्देशांक हा लोकसंखेवर नाही तर उपलब्ध स्रोतांवर अवलंबून असायला हवा. लोकसंखेनुसार एफएसआय वाढवत नेला तर या शहरात अराजक माजेल. वास्तु वारश्यात अनेकदा केवळ एक इमारत नाही तर आसपासचा संपूर्ण भाग येऊ शकतो. पण म्हणून आख्ख्या मुंबईच्या लोकसंखेचा भार खोताची वाडी किंवा मरीन ड्राइववर कसा टाकता येईल?

                        या जुन्या इमारती आता पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांचा पुन:र्विकास हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे असा दूसरा एक शोध या लेखकाने परस्पर लावून टाकला आहे. हेरिटेज कोंझरवेशन बाबतची काहीही माहिती न घेता हे सगळे लेखकाच्या मनाचे मांडे बिनतोड असल्यासारखे लोकांच्या गळी उतरवले जात आहेत. संपूर्ण जगात असा आचरटपणा कुणी केला नाही . . असे पालिकेचा कुणी अधिकारी म्हणाला असे लेखक म्हणतो. या अधिकार्‍याचे जग किती मोठे आहे हे माहीत नाही पण इथे एक उदाहरण द्यावेसे वाटते, जर्मनीतल्या फ्रॅंकफर्ट शहराजवळचे विसबादेन नावाचे एक मोठे शहर महायुद्धातल्या बॉम्बवर्षावातून आश्चर्यकारकरित्या वाचले होते. आजही त्या शहरातल्या बहुतेक सगळ्या इमारती महायुद्धापूर्वीच्या आहेत. पाच सात मजल्याच्या या इमारतींना लिफ्ट नाही, पार्किंगची सोय नाही. शहरातल्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजू पार्किंगने सदैव भरलेल्या असतात. लोक पाच सहा मजले रोज जिन्याने चढ उतर करतात. परंतु तिथे विकास – पुन:र्विकास असल्या फुटकळ कल्पना नाहीत. सगळ्या इमारती काल परवाच बांधल्या सारख्या नव्या आहेत. हा आचरटपणा आहे का? कुणा एका मराठी बिल्डरची हृदय हेलावून टाकणारी करुण कथा ऐकवून लेखक वाचकांच्या हृदयाला हात घालतो पण ती इमारत सीआरझेड मध्ये येत होती, ती इमारत हेरिटेज होती हे त्या बिल्डरला माहीत नव्हते काय? किंबहुना म्हणूनच त्याने पावला पावला वर दक्षिणा दिली होती ना? आणि हे सगळं कशासाठी? तर पुन:र्विकास करून अफाट पैसा मिळवण्यासाठीच ना? पण आता आयुक्तांनीच आदेश काढल्याने त्याला आत्महत्येशिवाय मार्ग राहिला नाही यात चूक कोणाची? 

                        इंग्रज या देशातून गेल्या पासून वास्तु वारसा म्हणून बोट दाखवायला आपण एक वास्तु उभारू शकलो नाही. जे आहे ते टिकवण्याची कुवत आपल्या मध्ये नाही. पुन;र्विकास आणि त्यातून मिळणारा अफाट पैसा याच्यावर डोळा ठेवून  आपण या थाटात वावरतो आहोत की आपल्या पुढच्या पिढीचे आपण काहीच देणे लागत नाही. याच्या परिणामी आजचा हा सगळा कालखंडच उद्याच्या इतिहासातून नामशेष होऊ शकतो. कारण आता सगळे व्यवहार व्हर्चूअल होऊ लागले आहेत. ज्या वर्तमानपत्रात हा लेख तुम्ही वाचताय ते आणि इतर सगळी वर्तमानपत्रे दहा वर्षांनंतर छापली जाणार नाहीत. संपर्क क्रांतीमुळे अभिलेख उरणार नाहीत. पुन:र्विकासाच्या कल्पनेमुळे दाखवायला वास्तु राहणार नाहीत. उद्याच्या जगात कोण कशाला दखल घेईल आपली? आणि वस्तु वारसा नकोच असेल तर मग बोरीबंदरचे रेल्वे स्टेशन आणि कान्हेरीच्या गुंफा तरी कशाला हव्यात? सगळच पडून तिथे इमारती बांधू. एलिफंटामधली शिल्प तोफा लावून पाडणारे पोर्तुगीज, बुद्धमुर्ती फोडणारे तालीबानी आणि आपल्यात फरक तो काय? विंस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते, आधी समाज इमारती घडवतो, मग इमारती समाज घडवतात, पण दोन हजार वर्षे जुन्या लेण्यांना प्लायवूडचे दरवाजे ठोकून त्यात राहणारे लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाकडून वास्तु वारश्याच्या संवर्धनाची काय अपेक्षा करणार?  

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

पाण्याशिवाय तरंगणारे सुंदर जहाज - शिप ऑफ थिसीयस


पाण्याशिवाय तरंगणारे सुंदर जहाज


शिप ऑफ थिसीयस



                शाळेचे दिवस संपले. अकरावीत गेलो आणि सगळेच बदलले. नवे मित्र, मास्तर नवीन, विषय नवीन, भाषा नवी. . .  पुस्तके इंग्रजीत असली तरी वर्गातली सगळी मुले मराठी माध्यमातूनच आलेली त्यामुळे सगळा राडा मराठीतच चाले, मास्तर पण बरचसं मराठीतच बोलत. पण त्या वर्गात एक डिसोझा नावाचा खिरीस्ताव मुलगा होता तो मात्र फाडफाड इंग्रजीत बोलत असे आणि आम्ही सगळे खुळ्यासारखे सारखे आ वासून त्याच्याकडे पाहत असू. त्याच्या, म्हणजे आमच्याच वयाचा इंग्रजी बोलणारा मुलगा आम्ही कधी पहिलाच नव्हता. त्याच्या त्या फाडफाड इंग्रजीचे आम्हाला जितकं कौतुक वाटत असे तितकाच आमच्या इंग्रजीचा न्युंनगंड. पुढे ती शाळाही संपली, मग कधीतरी लक्षात आले अरे डिसोझा तर साला किती चुकीच इंग्रजी बोलत होता. पण आजही कधी त्या शाळेजवळून गेलो तर जे काही आठवते त्यात डिसोझा नक्की आठवतो. त्याचे ते फाडफाड इंग्रजी आठवते आणि कसे का असेना पण ते भारावून जाणे ही आठवते. मनाच्या खोल कप्प्यात ती मुलायम आठवण अजून जपून राहिली आहे.

            काल शिप ऑफ थिसीयस पहिला. ग्रीक तत्वज्ञानातल्या एका प्रगल्भ विषयावरचा एक वेगळा सिनेमा म्हणून त्याची प्रसिद्धी आधीच झाली होती. जाणीवपूर्वक सिनेमा पाहायला लागल्यापासून अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रिलीज झाल्याबरोबर सिनेमा पाहण्याचे खूळ आता मागे पडले आहे. प्रसिद्ध ग्रीक तत्ववेत्ता प्लुटार्चचा तो जहाजाचा सिद्धान्त (पॅराडॉक्स), एका जहाजाचे भाग दुसर्‍या जहाजास लावले आणि असे करीत करीत सगळेच भाग बदलले तर मूळ जहाज हे मूळ जहाज राहील का?, तीन वेगळी कथानके आणि त्यांचा परस्पर संबंध हे सगळे वाचून झाले होते.

              सिनेमा सुरू होतो तो अंध फोटोग्राफर आलियाच्या कथेपासून. त्यानंतर जैन साधू मैत्रेय आणि मग एक राजस्थानी शेअर ब्रोकर नवीन यांच्या कथा क्रमाने येतात. या सगळ्यात एक समान धागा म्हणजे या तिघांचेही अवयव बदलले गेलेत. आलियाचा डोळा, मैत्रेयचे लिव्हर आणि नाविनची किडनी. या अवयव प्रत्यारोपणांनंतर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. समान धागा आणि प्रतिक्रिया वेगळ्या केवळ इतकाच फरक या कथांमध्ये नाही तर यांची सुरुवात आणि शेवट वेगवेगळे आहेत. आलिया अंध आहे तिला एक डोळा मिळतो आणि दिसू लागते. तिच्या कथेच्या मध्ये प्रत्यारोपण येते. आधीची आलिया आणि नंतरची आलिया हे स्पष्ट द्वंद्व समोर येते. मात्र पुढच्याच कथेत मैत्रेयचे प्रत्यारोपण कथेच्या शेवटी होते. प्रत्यारोपणानंतरची मैत्रेयची प्रतिक्रिया, त्याचे व्यक्तिमत्व आलिया प्रमाणे तपशिलात दिसत नाही. तर नवीनच्या बाबतीत प्रत्यारोपणझाल्यापासून कथेला सुरूवातीला होते. त्यामुळे प्रत्यारोपणापूर्वीचा नवीन कथेत दिसत नाही. कथेच्या आशयाच्या दृष्टीने आलिया, मैत्रेय आणि नवीन ही तीन जहाज आहेत ज्यांचे पार्ट्स बदललेत.

               या तीनही कथा हे सिनेमाचे करकरीत कापलेले तुकडे आहेत. अवयव प्रत्यारोपण या एका गोष्टीखेरीज एका तुकड्याचा दुसर्‍या तुकड्याशी तसा काही संबंध नाही. सिनेमा इथेच वेगळा ठरतो. पटकथेचा सगळा कस लागतो तोही इथेच. हे तुकडे करकरीत कापून जेव्हा पटकथाकार आपल्यासमोर ठेवतो तेव्हा त्याला सिनेमाच्या मुळ तत्वज्ञानाची जोड आहे का? जर एकादया जहाजाचे भाग दुसर्‍या जहाजात जोडले आणि असे करता करता सगळेच भाग बदलले गेले तर ते जहाज मुळ जहाज राहील का?’ हा त्या ग्रीक तत्ववेत्याला पडलेला प्रश्न सिनेमाचा आशय आहे. हा सांधा कायम राखण्यासाठी तर लेखक हे तुकडे म्हणजे सिनेमाचे भाग आपल्या समोर सादर करीत नसावा?

                सिनेमाला स्थळ काळाचा संदर्भ नाही, या तीनही गोष्टी एकाच काळात घडताहेत, एकाच शहरात घडताहेत याचे ठोस संकेत नाहीत. शहरामागून शहरे येत जातात, अगदी देश सुद्धा बदलतात. आलियाची कथा एका शहरात (बहुदा मुंबईत) घडते. या कथेला एक वेगळी खोली आहे. ती खोली जशी वैचारिक आहे तशीच दार्शनिक ही आहे. जवळ जवळ प्रत्येकच फ्रेम मध्ये ती खोली दिसत राहते. एक तिसरी मिती जाणवत राहते आणि जवळ जवळ प्रत्येकच फ्रेम मध्ये पाठीमागे कुठेतरी एक खिडकी, प्रखर प्रकाश ओतणारी एक खिडकी ही खोली अधिकच गहरी करते. पुढे अंध आलिया आणि मागे तो प्रखर प्रकाश अगदी रात्रीच्या प्रसंगात गॅलरीतून दिसणारे इमारतींचे आणि रस्त्यावरचे दिवे सुद्धा फ्रेम मध्ये प्रकाश आणत राहतात.

                कॅमेरा म्हणजे प्रती नेत्र. फोटोग्राफर नेत्रहीन असूच शकत नाही हा आपला समज चित्रपट खोटा ठरवतो. नव्या तंत्रज्ञानाने हे कसे शक्य होऊ शकते हे पडद्यावर तपशिलात दाखवले आहे. मात्र हे अत्यंत महागडे तंत्रज्ञान परदेशी फोटोग्राफरलाच परवडू शकते, म्हणून कदाचित आलिया हे पात्र परदेशी झालं असावं. मात्र डोळ्याचे प्रत्यारोपण एका फोटोग्राफरच्या दृष्टीने आणि त्यात ती जर मुलगी असेल तर अधिकच संवेदनशील ठरणे साहजिक होते आणि तसे ते प्रभावी ही झाले आहे. पूर्वीची आलिया आणि नंतरची आलिया हा भावनात्मक बदल आणि या बदलातून सुरू झालेला तिचा स्वचा शोध ते तत्वज्ञान पुरेसं सिद्ध करतं. मात्र तरीही पुढच्या दोन कथा येतात.

                मैत्रेय एक तरुण जैन साधू, स्वत:चा, सत्याचा आणि त्याच्या भोवती असलेल्या पर्यावरणाचा शोध घेणारा, मुक्या प्राण्यांच्या हक्काबाबत लढणारा आणि त्यात त्यामानाने तरुण म्हणजे वयाच्या नैसर्गिक उर्मिच्या विरोधात जाऊन सन्यासी आयुष्य जगण्याचा विरोधाभास याही कथेत आहे,  त्यामुळे पहिल्या कथेत अंध व्यक्ति आणि फोटोग्राफी हा संबंध जितका प्रभावी ठरतो तितकाच हाही संबंध प्रभावी ठरतो. फर्मास्यूटिकल कंपन्या प्राण्यांवर करीत असलेल्या अत्याचाराविरुद्ध लढणार्‍यावर त्याच कंपनीची औषधे घेण्याची वेळ येणे हा या कथेतला मानसिक संघर्ष आहे. अवयव बदलला तर ती औषधे घेणे क्रमप्राप्त होईल, हे ही मैत्रेयचे त्या प्रत्यारोपणाला विरोध करणाचे एक कारण आहे. त्याच मैत्रेयचे शेवटी आपल्या तत्वाला मुरड घालून परिस्थितीला शरण जाणे हे त्याचे तात्विक अध:पतन म्हणजे ही दुसरी कथा.

            नवीन एक टिपिकल शेअर ब्रोकर. सतत पैसा आणि व्यवहाराच्या गोष्टी करणारा आधुनिक तरुण. किडनी बदलणे हा त्याच्या दृष्टीने एक व्यवहार आहे. त्याची सामजिक कार्यकर्ती असलेली डाव्या विचारांची आजी आणि नवीन हे दोघे वैचारिक दृष्ट्या दोन टोकांवर आहेत. फसवून किडनी काढून घेतलेला एक बांधकाम मजूर शंकरशी त्याची भेट होते. किडनी दिलेला आणि किडनी घेतलेला असा एक ऋणानुबंध त्यांच्यात आहे त्यात आजीने घेतलेले बौद्धिक यातून तो शंकरच्या किडणीचा शोध घेतोय. ही तिसरी कथा. वरकरणी आपल्याला असे वाटते की आलिया, मैत्रेय आणि नवीन ही ती तीन जहाज आहेत ज्यांचे पुर्जे बदललेत आणि त्यांच्या ह्या तीन कथा. मात्र तिसर्‍या कथेतला शंकर आणि त्याची किडनी मिळालेली स्टॉकहोम मधील एक व्यक्ती ही सुद्धा दोन जहाजं आहेत. पहिली तीन जहाजं चित्रपटात ज्या पद्धतीने अधोरेखित केली गेलीत त्या तुलनेत ही दोन जहाजं दुर्लक्षली गेलीत किंबहुना ही दोन जहाजं आहेत हे भान लेखकाला पटकथेत राहिलेल नाही. सगळ्यात शंकर हे विषयाच्या अंगाने पाहता एक महत्वाचे पात्र होते, कारण मुख्य तीन कथेत ज्याच्याकडून या तिघांना अवयव मिळालेत ते मूळ जहाज आता नष्ट झालयं. त्यामुळे तीन कथांमध्ये जी पाच जहाज येतात त्यात शंकर हेच एक जहाज असं आहे ज्याने आपला पार्ट दिलेला आहे, उरलेल्या चौघांनी पार्ट्स घेतलेले आहेत. या पाच जणांचा वेगवेगळा बदल म्हणजे या पॅराडॉक्सची उत्तरे असायला हवी होती. पण इथे ही उत्तरे एकसूरीच मिळतात. मुळात शंकर आणि स्टॉकहोमकर यांना जहाजच न मानण्यामुळे आपल्याला उत्तरे पहिल्या तिघातच शोधावी लागतात आणि ती काहीशी सारखीच मिळतात.  
                आता हळू हळु हे जाणवू लागत की या तीनही गोष्टीत प्रथम दर्शनी जरी अवयव बदल हा समान धागा असला तरी शोध हे ही एक महत्वाचे सूत्र आहे, जो नवीनच्या कथेत प्रत्यक्ष समोर दाखवून अधोरेखित केलेला आहे. लेखकचा हा मुद्दा छायालेखक उचलून धरतो म्हणूनच चित्रपटभर कॅमेरा फिरत राहतो की काय असे वाटू लागते. एकावर एक पडणारे शॉटस या चित्रपटात नाहीत हे या चित्रपटाच्या छायालेखनाचं वैशिष्ट्य आहे. 

                चित्रपटाची एक भाषा असते असे आपण ऐकतो, माझ्या मते चित्रपटाला केवळ भाषा नसते तर लिपि, व्याकरण, वाणी सुद्धा असते आणि हे सगळं एका लयीत असेल तर ती भाषा बनते. लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, संकलक आणि कला दिग्दर्शकाने ही लय सांभाळायला हवी, पण या चित्रपटाच्या भाषेत ते झाले नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. लांबच लांब शॉटस आणि काही निरर्थक सीन्स म्हणजे आर्ट फिल्मचे स्टँडर्ड असा काहीसा समज संकलक आणि छायालेखकाने करून घेतलेला आहे. तुम्ही स्टँडर्ड काहीही वापरा शेवटी पडद्यावर जे दिसत त्याने इच्छित परिणाम साधायला हवा. कदाचित एकच कॅमेरा वापरण्याच्या व्यावसायिक तडजोडीतून हा मार्ग स्वीकारला गेला असावा. अलियाची मुलाखत आणि नवीन आणि स्टॉकहोम मधल्या त्या व्यक्तीतला वाद ही दोन उदाहरणे घेता येतील. सिंगल कॅमेरा वापरुन जवळ जवळ एकाच शॉट मध्ये घेतलेली आलियाची मुलाखत सिंगल कॅमेरा वापराचा उत्तम नमूना आहे. मात्र नवीन आणि स्टॉकहोमकराच्या संघर्षात पुन्हा तोच फॉर्म्युला वापरल्याने सगळा संघर्ष बेचव होतो. पुन्हा चित्रपटात संघर्ष हा तेवढाच आहे. शॉटस इतके लांब की एक शॉट एक सीन होईल की काय असं वाटतय न वाटतय, अर्थात असे असायला काहीच हरकत नव्हती जर ती सीनची गरज असेल तर, तोच शॉट संपून पुढच्याच एका छोट्याश्या दुसर्‍या शॉटने सीन संपतो. ह्या मागे काहीच विचार नाही का? फोटोग्राफर आलियाच्या कथेत हर एक फ्रेम मध्ये दिसणारी ती प्रकाश ओतणारी खिडकी किती सयुक्तिक दिसत होती, त्यात एक विचार दिसत होता, पण तीच खिडकी पुढे मैत्रेय आणि नवीनच्याही कथेत येत राहते आणि मग यामागे काही विचार वाटत नाही, कारण या कथांमध्ये सूत्र एक असलं तरी प्रत्येकाचं वातावरण वेगळं आहे. मुळात जर या कथा म्हणजे करकररीत कापलेले तुकडे म्हणजेच पार्ट्स आहेत असा आभास निर्माण करायचा तर त्या मुळातून इतक्या वेगळ्या वाटायला हव्या होत्या की जणू तीन कथा तीन वेगळ्या दिग्दर्शकाने बनवल्या आहेत. किमान त्यांचा पोत तरी वेगळा असायला हवा होता. अगोदर म्हटल्या प्रमाणे कॅमेरा सतत फिरता ठेवून शोध या सूत्राचे अधोरेखन होते पण कॅमेर्‍यात काय दिसते ते ही महत्वाचे आहे ना? मैत्रेयच्या खपाटीला गेलेल्या पोटावरून, त्याच्या बेडसोर्स वरून कॅमेरा संथपणे फिरत जातो आणि वाटते का हे सगळे इतक्या तपशिलात दाखवले जातेय? मैत्रेय झालेला नीरज कबी इतका सुंदर अभिनय करीत असताना त्याच्या वेदना इतक्या जवळून का दाखवायच्या? कॅमेरा कलाकाराच्या किती जवळ जावा याचे काही ठरलेले संकेत इथे छायालेखक मोडतो ते कशासाठी? असच वातावरणाबाबतही म्हणता येईल. भल्या पहाटे उठून जैन साधू मैत्रेय मुंबईच्या रस्त्यावरून चालत हायकोर्टापर्यन्त येतो तेव्हा पाऊस पडत असतो. शेवटी जेव्हा तो आपल्या तत्वांना मुरड घालून परिस्थितीला शरण जातो तेव्हा मागे (पुन्हा एक खिडकी) लख्ख प्रकाश ओतत असते आणि त्या प्रकाशाची एक किनार त्याच्या शरीरावर पसरलेली असते. म्हणजे जेव्हा त्याच्या वैचारिक उन्नत्तीचा काळ आहे तेव्हा वरून खाली पडणारा पाऊस, आजूबाजूला दाटलेला अंधार आणि जेव्हा त्याचे अध:पतन होते तेव्हा लख्ख प्रकाश. हा विरोधाभास कशासाठी? जरा विचार करूया की हे नेमकं उलट असत तर? म्हणजे त्याच्या कोर्टात जाण्याच्या वेळी उगवत जाणारा लख्ख प्रकाश देणारा सूर्य आणि त्याच्या अध:पतनाच्या वेळी, फॉलच्या वेळी वरून खाली कोसळणारा पाऊस आणि दाटलेला अंधार.

                सिनेमा पाहताना अनेकदा हे जाणवत राहत की दिग्दर्शक आणि छायालेखकही फ्रेमच्या प्रेमात पडलाय. खरेतर डॉक्युमेंट्री वाटेल इतक्या वास्तविक छायालेखनाची गरज असताना आणि प्रत्यक्षातली पात्रे जसे डॉक्टर, झोपडपट्टीतील माणसे खरीच वापरलेली असताना हे असं फ्रेमच्या सौंदर्यात दिग्दर्शकाने अडकून पडणे खटकते. यातून तो मग आपल्याला कुठे कुठे घेऊन जातो. एका शहरातून दुसर्‍या शहरात, दुसर्‍या देशात. या प्रेमापोटी मग एक नवीन सूत्र छायालेखनाच्या अंगाने बनत जात. अत्यंत कोंदट, गजबजलेल्या वातावरणातून एकदम सुखद, भव्य वातावरणात जाणे. आलियाच्या कथेत ती अंध असताना गजबजलेल्या रस्त्यावरून, वस्तीतून कॅमेरा आपल्याला फिरवतो तर शेवटी तो हिमालयात घेऊन जातो. एका भव्य निसर्गाच्या फ्रेमवर आलियाची कथा संपते. मुंबईच्या चाळीचाळीतून फिरणारा मैत्रेय पुढे पवनचक्क्या पार करीत बहुदा दिल्लीत (जे आर्किटेक्चर फ्रेम मध्ये दिसते ते दिल्लीचे टिपिकल आर्किटेक्चर असल्याने तसे वाटले इतकच.) पोहोचतो तर मुंबईच्या झोपडपट्टीत शंकरचा शोध घेत फिरणारा नवीन स्टॉकहोमला पोहोचतो आणि दरवेळी आपल्याला कुणीतरी ओढत नेल्याची जाणीव होत राहते.

                या फ्रेमच्या वेडापायीच मग हरकिसनदास हॉस्पिटलची ती भव्य फ्रेम कारण नसताना येते. एकदा सोडून दोनदा येते. भाऊ दाजी लाड मुझियम येते. हे चकचकीत सौन्दर्य विषयाला मारक ठरत. लेखक, दिग्दर्शक, छायालेखक, कला दिग्दर्शक, संकलक वेगवेगळ्या सुरात बोलू लागतात आणि चित्रपटाची भाषा बेसुर होते, अशुद्ध होते. तरीही ती वेगळी असल्याने आपण क्षणभर भारावतो. जसा मी डिसोझचं इंग्रजी ऐकून भारावलो होतो. 

            अर्थात हे काहीही असलं तरी हा चित्रपट एकदा जरूर पाहायला हवा. पडद्यावर अभिनय कसा करायचा याचा परिपाठ हा चित्रपट घालून देतो. तसेच पॅराडॉक्स ज्या चित्रपटाचा विषय आहे तो चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मुख्यधारेतल्या अनेक पॅराडॉक्सना ठोस उत्तर देतो. एकही स्टार नसताना पिक्चर पाहायला कोण येणार? या असल्या विषयावरचा सिनेमा पाहायला थेटरात कुत्रं तरी फिरकेल का? एकही गाणं नाही मग गाण्याच्या रॉयल्टीचे काय? सॅटेलाइट राइट कोण विकत घेणार? ह्या असल्या फालतू प्रश्नांमुळे जे अनेक उत्तम नवनवीन विषय आज अनेक तरुण दिग्दर्शकांच्या डोक्यात बंद आहेत ते हा सिनेमा उद्या बाहेर आणील असे वाटते. सिनेमा विकण्याचे एक नवं तंत्र या सिनेमाने विकसित केले ज्याचा फायदा तरुण निर्माते घेतील अशी ही आशा वाटते. 

          पाण्याशिवाय चालणारं हे सुंदर जहाज आपल्याला अनेक ठिकाणी नेऊन सुद्धा वैचारिकदृष्ट्या कुठेच नेत नसले तरी भारतीय चित्रपटसृष्टीच्या मुख्यधारेत त्याने छोटस का होईना पण वादळ निर्माण केल हे मात्र खरे आहे. त्यासाठी आनंद गांधी, किरण राव, सोहम शाह यांचे अभिनंदनच करायला हवे.  



***** 

रविवार, ७ जुलै, २०१३

ज्युली


ज्युली


                 आज दुपारी जेवताना सहज टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करीत होतो, मध्येच नदीरा आणि ओमप्रकाश दिसले. पाहतो तर ज्युली. नॉस्टेलजियाचा एक सुखद झटका. इ.स. १९७५ चे ते साल. तेव्हाच्या तरुणाईची बॉबीची धुंदी पुरती उतरलीही नव्हती तोच ज्युलीची पोस्टर्स झळकलेली. त्याकाळची हाताने रंगवलेली पण अत्यंत जीवंत वाटणारी ती पोस्टर्स म्हणजे चित्रसृष्टीची जान. फक्त पोस्टर पाहून पिक्चर चालणार की पडणार हे भाकीत काही रसिक महाभाग तेव्हा वर्तवत असत.
              
             राजेश खन्ना नावाचं एक गारुड बर्‍यापैकी अंमल गाजवत होत आणि अमिताभ नावाचं वादळ दारात येऊन ठेपल होत असा तो भारावलेला काळ. त्या काळात कोणतेही नाव नसलेली, ग्लॅमर नसलेली जोडी घेऊन बॉबी, ज्युली सारखे चित्रपट बनवणे आणि ते यशस्वी करणे हे केवढं मोठ आव्हान. पण तगड्या लेखक आणि पटकथाकारांच्या जादुई कुंचल्याच्या बळावर ते लीलया पेलणारे दिग्गज दिग्दर्शक ही त्या काळच्या चित्रांची खासियत होती.

          विक्रम आणि लक्ष्मी सारखी अगदीच अनोळखी नावे असलेला हा चित्रपट उत्तम पटकथेसाठी जरूर पहायला हवा. खरे तर तो नादिराच्या जबरदस्त अभिनयासाठीही पहायला हवा. पण नादीराबरोबरच मला भावला तो यातला ओमप्रकाशाचा मॉरिस. नादिरा मार्गारेट आणि ओमप्रकाश मॉरिस ह्या भूमिकेसाठीच जन्माला आल्यासारखे ते भूमिका जगले. पण नादिरा केवळ अप्रतिम. रुबी मायरचे एका छोट्या भूमिकेतले दर्शन अत्यंत लोभसवाणे आणि जेमतेम काही वाक्ये असलेली तेव्हाची बाल कलाकार आणि आताच्या हवाहवाई श्रीदेवीला ज्युलीची बहीण म्हणून पाहणे हा ही एक अधिकचा आनंद. ज्युलीवर मनापासून प्रेम करणार्‍या जलाल आगासाठी मात्र शेवटपर्यन्त मन चुकचुकत राहत. उत्तुंग, दिग्गज कलाकारांना तितक्याच तोडीचे लेखक दिग्दर्शक लाभले तर काय होऊ शकते ते म्हणजे – ज्युली.

                  लक्ष्मीचे मोहक दिसणे आणि तितकाच सहज सुंदर अभिनय, तिचे सेक्स अपील आणि पडदा पेटवणारा मोकळा प्रणय. हे सगळं सगळं जरी कथेला आवश्यक होत तरी दिग्दर्शक सेतुमाधवनमुळे आलेल्या दाक्षिणात्य बोल्ड शैलीचाही तो प्रभाव असावा किंवा बॉबीच्या यशातून निर्माण झालेली अपरिहार्यता असावी.

                   पटकथा इंदर राज आनंद, संवाद बलदेव राज आणि मल्याळी दिग्दर्शक सेतुमाधवन यांचा ज्युली हा उत्तर दक्षिण शैलीचा मिलाफ होता. खरेतर जात किंवा धर्माचे प्रेमाच्या आड येणे, त्यातून निर्माण होणारा संघर्ष, (इथे एक नवा आयाम आहे अँग्लो इंडियन) आणि मग गोड शेवट इतक साध सोप कथानक, पण पटकथेच वैशिष्ट्य असे की कुठेही कथानकाचा वेग मनावरची पकड सोडत नाही. प्रत्येकच प्रसंगात पुढे येऊ घातलेल्या संकटाचा गडदपणा व्यापून राहतो आणि तो अधिक गहिरा होतो तो बाप लेकीच्या नातेसंबंधातून. ओमप्रकाश आणि लक्ष्मी – मॉरिस आणि ज्युलीचे एका तरुण, वयात आलेल्या मुलीचे आपल्या बापावरचे प्रेम इंदर राजने ज्या नैसर्गिक रंगाने रंगवले आहे ते पाहत असताना मॉरिसचे जाणे साहजिक होऊन बसते आणि म्हणूनच मनाला चटका लावते. मॉरिसच्या जाण्याची बातमी रुबीआंटी ज्युलीला सांगते तो प्रसंग कलाकार आणि दिग्दर्शक सगळ्यांचीच कसोटी. पण रुबी सारख्या जेष्ठ अभिनेत्रीने या प्रसंगात जे काही केले आहे ते केवळ लाजवाब.
 
                   इ.स. १९७५ चा सुमार भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम पंचवीस वर्षे होत आलेली. इंग्रज भारत सोडून गेले तरी त्यांचा संकर झालेला एक मोठा अँग्लो इंडियन समाज अस्तीत्वात होता जो भारताला आपला देश मानायला तयार नव्हता. धर्माबरोबरच या समाजाचे प्रेमाच्या आड येणे, खलनायक होणे ही पडद्यावर जरी नावीन्यपूर्ण कल्पना असली तरी ते समाजातले वास्तव होते. औध्योगीकरणाची सुरुवात होऊन नुकताच काही काळ लोटलेला. त्याचे प्रतीक म्हणून चित्रपटात रेल्वे येते. रेल्वेची ती प्रचंड धुड, ते वेडेवाकडे रूळ, अवाढव्य लोखंडी पूल ते ओलांडत ज्युलीचे पडद्यावर अवतरणे यातून ती सगळी प्रतीक तो काळ पडद्यावर उभा करतात. ही प्रतिकं सुद्धा चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावत असतात.  टेलिफोन, गाडी ही सगळी प्रतिष्ठेची लक्षणे मानण्याचा तो काळ. याच खोट्या प्रतिष्ठेपायी बायकोला खुश करण्यासाठी मॉरिस एक जुनी सेकंडहँड गाडी घेऊन येतो, मार्गारेटसाठी मात्र त्या गाडीचे इंपोर्टेड असणे महत्वाचे असते. मात्र जेव्हा ती खटारा गाडी रस्त्यात बिघडते तेव्हा सगळं कुटुंब ती ढकलत घरी घेऊन येते. मॉरिस याच खोट्या प्रतिष्ठेचे पडलेले डाग अंगभर वागवित घरात येतो तेव्हा चित्रपट कुठेतरी पुढच्या घटनांची सूचना देत असतो. पुढे बर्‍याच काळानंतर याच रस्त्यावरून मार्गारेट जेव्हा बिघडलेल्या ज्युलीला दुरुस्त करून घेऊन येते, तेव्हा या प्रसंगाची आठवण येते आणि त्या खोट्या प्रतिष्ठेचे ते डाग तिथेही दिसू लागतात.         

                   चित्रपट सगळ्यात जास्त घडतो तो मॉरिसच्या घरात. त्या घरात प्रेम आहे, आपुलकी आहे त्याच बरोबर पराकोटीची भांडणे आहेत. याच घरात ज्युली लहानाची मोठी झालीय. वयात आलीय आणि वयाबरोबर येणारी संकटेही घेऊन आलीय. कुटुंबाबरोबर एकत्र व्हिस्की पिण्याचा प्रसंग, त्यानंतर माय हार्ट इज बिटिंग. . गात सगळं कुटुंब फेर धरून नाचतानाचा प्रसंग असो किंवा बापाला जेवणाचा डबा देत निरोप देण्याचा प्रसंग किंवा ती गरोदर असल्याचे आईला सांगतानाचा प्रसंग, रंग वेगळे असले तरी एक गोष्ट सतत जाणवत राहते ते म्हणजे त्या घरात भरलेले येशूचे अस्तित्व. ते अस्तित्व मग रंग आणखी गडद करते. मुलाला मारण्या ऐवजी जन्म देवून ज्युलीची सुटका करण्याचा पर्याय त्या अस्तित्वाला धरून पटकथेत येण मग साहजिक ठरत आणि ते क्लायमॅक्सला पूरकही  ठरत.

                   इथे जस येशूच अस्तित्व आहे तसच तिथे उत्पल दत्त – भट्टाचार्‍यांच्या घरात कृष्णाच अस्तित्व आहे. तू शाम मेरा साचा नाम तेरा ... या भजनावर ज्युलीचे त्या घरात येणं. अत्यंत तोकड्या स्कर्ट मधून दिसणारे पाय आणि पाठमोरी ज्युली फॉलो करीत कॅमेरा सरकत जाणे आणि मागे तू शाम मेरा .. जवळ जवळ निम्म गाण हे असच फक्त ज्युलीवर चित्रित झालेल. लेखक दिग्दर्शक प्रत्येकच फ्रेम मधून, प्रसंगातून पुढे घडणार्‍या गोष्टींची झलक देत आहेत. तिचे तुळशी वृंदावनापाशी थबकणे आणि घरात गेल्यावर आत देवघरात उषा आणि उषाची आई - रिटा भादुरी आणि अचला सचदेव तू शाम मेरा .. गाताना त्यांच्या आणि ज्युलीच्या मध्ये दिसणारा पातळ झिरझिरीत पडदा खूप काही सांगून जातो. आज तुम्हारे डॅडी के जगह तुम्हारा ममी, हम बोटल खोलेगा म्हणणारी ज्युलीची आई त्या घरात आहे तशी मासिकपाळीत चार दिवस स्वयंपाकघरात न येणारी शशीची आई या घरात आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून लेखकाने त्यांची ही व्यक्तिमत्वे खुबीने उभी केली आहेत. कारण खरा संघर्ष याच संस्कृती आणि खोट्या प्रतिष्ठेचाच आहे.   

                   बलदेव राजचे सहज सोपे संवाद ही सिनेमाची खास जमेची बाजू. अगर हम व्हिस्की मे पानी डालेंगे तो लोग दूध मे कया डालेंगे?’ असले टाळीबाज संवाद असो किंवा नादीरा आणि रुबी मायर मधले भावनिक संवाद असोत त्याला एक नैसर्गिक प्रवाह आहे. पटकथाकाराने आणि संवाद लेखकाने सुद्धा मार्गारेट वर खास मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आणि नादिराने त्या मेहनतीचे सोन केलय. पण लक्षात राहते ते उत्पल दत्तचे शेवटचे वाक्य मार्गारेट, सफेद चमडी के साथ तुम्हारा खून भी सफेद हो गया है? लगता है तुम्हारी गाडी स्टेशन मे आ गयी. सिनेमातल शेवटचं वाक्य. संपूर्ण पडद्यावर पाठमोर्‍या नादिराचा क्लोजअप. काही क्षणांचा अवकाश, नादिराचा चेहर पडद्यावर दिसत नाहीय पण त्यावर का भाव असतील ते तिच्या दहबोलीतून जाणवताहेत . . . आणि क्षणात नादिराचे मागे फिरणे.  

                 ज्युलीच्या संगीताबद्धल काय सांगावे? राजेश रोशन, आनंद बक्षी, हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय, लता, आशा, उषा, किशोर आणि प्रीती सागर. संगीताची सगळी टीमच उत्कृष्ट होती. यह राते नई पुरानी.. हे लताने गायलेले सोलो असो किंवा सांचा नाम तेरा . . हे आशा उषाने किंवा त्या प्रणय दृश्यातले भूल गया सब कुछ . . हे लता किशोरचे द्वंद गीत असो. ज्युलीच्या संगीताने तेव्हाच्या तरुणाईची मने जिंकली. प्रीती सागराच्या  माय हार्ट इज बिटिंग. . ने कित्येक प्रेम प्रकरणे सुरू झाली असतील. पण शेवटी मनात गुंजत राहते ते किशोरचे - दिल कया करे . . किशोरचा तो संयत, मऊ मुलायम स्वर आणि त्यामागे राजेश रोशनने वापरलेला ऑर्केस्ट्रा खास करून ते एलेक्ट्रोनिक गिटार. तेव्हा राजेश रोशनचा अरेंजर कोण होता कोण जाणे पण ज्या कुणी ते अरेंज केलय . . हॅट्स ऑफ टु हिम.

                 ह्या गाण्याच्या बोलांविषयी काय बोलावे?

दिल कया करे जब किसीसे किसिको प्यार हो जाए
जाने कहा कब किसिको किसीसे प्यार हो जाए
ऊंची ऊंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे
ना कुछ तेरे बस मे ज्युली ना कुछ मेरे बस मे
दिल कया करे . . .

                 ह्या गाण्यावर त्याकाळी ज्यांनी हृदये जिकली, दिली-घेतली, हरवली ती पिढी आता पन्नाशीत असेल पण ह्या गाण्याचे बोल ज्यांनी लिहिले ते हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय हे बोल लिहिताना सत्याहत्तर वर्षांचे होते हे आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही.


****

शनिवार, ६ जुलै, २०१३

रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट




रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट

रिदम हाऊसच्या चौकात गाड्या ओलांडत कसाबसा रस्ता क्रॉस केला आणि दोन चौकांच्या मधून पुढे निघालो. एका चौकाच्या भिंतीवर कुणा एका नगरसेवकाच्या सौजन्याची पाटी लागलेली, त्यावर पानाच्या पिचकारीचे काही शिंतोडे उडालेले. ती पाटी सुद्धा पार करीत मी जेव्हा जहागिरच्या दरात पोहोचलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.   

जंहागिर मध्ये शिरल्या शिरल्या उजव्या बाजूची एक प्रशस्त गॅलरी.
रझाच प्रदर्शन लागलेल, विस्तार.
मी काचेचा दरवाजा ढकलून आत शिरतो.
समोरच्या कोपर्‍यात एक भला मोठा सोफा, कोर्नर पीस मांडलेला, बाजूला दोन ऊंची खुर्च्या, समोर ज्याला टी पॉय म्हणायला शरम वाटेल अस एक छोट टेबल आणि मागे एक संदूक आणि ह्या सगळ्यावर कुठे कुठे रेळलेले एक कुटुंब.  डोळ्यांवर काळा गॉगल, पायात जिन आणि पावलात पांढरे शूज घातलेला एक तरुण, स्कीन-टाइट ट्राऊजरवर शर्ट घातलेली एक तरुणी आणि दाढीच्या ठेवणीवरून मुस्लिम भासावा असा एक मध्यमवयीन फाटका माणूस आणि त्याच्या हातात एक गोंडस बाळ. हा दाढीवाला बहुदा त्यांचा ड्रायवर किंवा घरगडी असावा आणि लुकलुकत्या डोळ्यांनी इतस्तता सैरभर पाहणारा बहुदा त्यांचा कुलदीपक असावा. केसांचा रंग चेहर्‍यात उतरल्यागत पांढर्‍या फटफटीत दोन मध्यमवयीन बायका. असे पाच, साडे पाच जण मोठमोठ्यानं कुजबुजत होते. ते लुकलुकते डोळे सुद्धा मध्येच किंचाळत होते.

असेच काही ऊंची सोफे प्रत्येक कोपर्‍यात मांडलेले.
म्हटले व्वा, रझाचे एक्झिबिशन म्हणजे काही तास जाणार.
उभ राहून थकायला झालं तर अधून मधून बसता येईल. केवढी मोठ्ठी सोय केलेली ही. शेवटी रझा कुणी साधासुधा कलाकार नाही. त्याच्या दर्ज्याला साजेसच सगळं असणार ना.
  
मी पहिल्या चित्राकडे वळलो. डावीकडच्या भिंतीवरच पहिलच चित्र. सहा फुट लांब आणि चार फुट उंच - सर्वत्र’. बरोबर मध्यावर एका चौकटीत एक मोठ्ठ काळनिळं वर्तुळ. रझाचा तो काळा सूर्य. उरलेल्या चार कोपर्‍यात चार मूलभूत रंग लाल तांबडा, निळा आणि पिवळा तर चौथ्या चौकटीत या सगळ्या रंगांना तोलणारा करडा रंग. हे चौकटीचे कोपरे की सूर्यातून बाहेर पडणारी ऊर्जा किरणे आणि त्या किरणातले ते अदभूत रंग.


ट्रीsss ट्रीss आजूबाजूला कॅमेर्‍याचे आवाज. मधूनच उडणारे फ्लॅश.
एक जण अंगात आल्यासारखा फोटो काढत होता.


त्या मधल्या सूर्य चौकटी पलीकडे त्या मूलभूत रंगातून उतरलेले अनेक रंग त्रिकोण. बरेच काही गडद तर काही फिकट, एक तर पांढरा फटक, अजिबात रंगाचा कण ही न चिकटलेला.

पाठीमागे लुकलुकणारे डोळे मागे किंचाळत होते. त्यांना गप्प करण्याचा दाढीवाल्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता. काळा गॉगलवाला कुठे होता कुणास ठाऊक.

मी पुढच्या चित्राकडे वळलो.
कृती प्रकृती पुन्हा एक भव्य कॅनवस, मात्र उभा. पुन्हा मध्ये एक काळा सूर्याचा गोळा. रझाची ही काळ्या सूर्याची सगळी चित्र आखीव रेखीव एका भव्य चित्र चौकटीत अनेक चौकटी. प्रत्येक चौकटीत अर्थ वेगळा पण तरीही पूर्ण चित्राचा आशय एकच. आतल्या चौकटीतले सूर्य वेगळे, त्यांचे रंग वेगळे त्यातून निघणारे ऊर्जा किरण पुन्हा वेगळ्या रंगाचे दरवेळी सहा पण दरवेळी रंगसंगती वेगळी.

एक्सक्यूज मीss  . . तो अंगात संचारलेला माझ्या पुढे आला. कॅमेरा जणू त्याच्या पंज्याचा भाग बनला होता. आता दोन चित्र दिसत होती. एक भिंतीवर, एक कॅमेर्‍यावर. कृती-प्रकृती

पुढे उत्पत्ति’.  पुन्हा एक भव्य उभी चित्र चौकट. वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये विभागलेली. सगळ्यात खालच्या पातळीवर काहीच नाही. गडद भासेल असा काहीसा किरमिजी निळा रंग, त्यात एक वर्तुळ थोडसं गडद, मात्र नेहमी सारख मध्यात नाही, तर बाजूला काहीसं वाट चुकलेल, भरकटलेल दिशाहीन. काय असेल ते? एखादा आदिजीव.
वरच्या पातळीवर पुन्हा तोच गोळा आता मात्र खूपच फिकट झालेला. दिसेल न दिसेल असा.
या पातळीवर बरोबर मध्यात एक गडद काळी, ठसठशीत आकृती. एक त्रिकोण खाली टोक आणि वर बाजू असलेला. आणि त्याच्या वर चिकटलेला तोच तो गोळा, मेंदू सारखा. ही आकृती मात्र बरोबर मध्यात, तिने कशाचा तरी वेध घेतलेली.
रझा उत्पत्तीचा शोध घेतोय.
पुढच्याच वरच्या पातळीवर अशाच दोन आकृत्या. दोन्ही आकृत्या चित्र-मध्यात. त्यांनीही आपली पोजिशन घेतलेली. मात्र आता त्यातला गडदपणा नाहीसा झालेला. ओळख पटू लागलेली. रंग दिसू लागलेले. वरच्या पातळीत पुन्हा दोन आकृत्या. आता रंग अधिक ओळखीचे. नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष.

दर दोन तीन चित्रांच्या मध्ये गळ्यात आय कार्डाच्या रिबिनि अडकवून हात मागे बांधलेले वॉलंटियर उभे होते. मार्टिना नवरातीलोवाच्या मॅच मध्ये उभे असतात तसे. आणि लोक काढताहेत फोटो, चित्रांचे आणि चित्रांसमोर पोज घेवून उभे राहून. रझा पाहल्याचा पुरावा म्हणून. वॉलंटियर मात्र हात बांधून उभे.

एका वॉलंटियरला ओलांडून पुढे गेलो,
पुढे अवतरण एक अतिभव्य उभा कॅनवास. मध्यभागी, थोडा वर एक सूर्य खोल चौकटीतून बाहेर येत असल्यासारखा. चौकटीच्या दोन बाजूंवर उतरंड वेगवेगळ्या रंगांची, संपूर्ण चित्र पिवळ्या उजळ रंगाने माखलेल. सूर्य अजून बाहेर यायचाय तर ही ओजस्विता. मग पुढे काय. . ?

पुढे सत्य.
सत्यमेव जयते पुढचे चित्र.
सत्याचा रंग कुठला?
तो तर नितळ शुभ्र पांढराच असायला हवा. पण पांढर्‍याला ही किती पापुद्रे? किती पदर? 
सगळेच पांढरे. हळुवार पांढरे. काळ्याची छटाच नाही, करडा ही नाही, राखाडी ही नाही. सगळेच पांढरे पण प्रत्येक पांढरा वेगळा. ही रझाची रंगांवरची हुकमत, ती ही पांढर्‍या!


त्या दोघींपैकी एक पांढरकेशी लगबगीने माझ्या समोरून गेली, हात मागे बांधून उभा असलेला मार्टिनाच्या मॅच मधला मुलगा पुढे धावला. पुढच्याच कोपर्‍यातल्या एका भल्या मोठ्या सोफ्यावर एक मध्यमवयीन बाई आणि तिची छोटी पोर विसावली होती. ही दोघे तिच्या कानाजवळ काही पुटपुटली. ती बाई दचकून उठली. म्हणजे त्या खुर्च्या, ते सोफे बसायला ठेवलेले नव्हते तर.


पुढे एक छोटसच चित्र नादबिन्दु आकृतीबंद सत्यमेव जयतेचाच. फक्त रंग वेगळे. ही खास रझाची आकृतीशैली. मध्यभागी एक बिन्दु आणि त्यातून उठणारे तरंग. शांत शीतल जलाशयावर एकदा ठिपका आकाशातून पडावा आणि तो तरंगातून मोठा मोठा होत जावा. तो ठिपका, तो बिन्दु हा खास रझाचा शोध. चित्रकार म्हणून बर्‍यापैकी रूळल्यावर जेव्हा एक रितेपण आले. जसे प्रत्येकच कलाकाराच्या कलायुष्यात येते, तेव्हा रझाचा आत खोल कुठेतरी शोध सुरू झाला नाविण्याचा. या शोधात त्याला सापडलेला हा बिन्दु. कदाचित मध्यप्रदेशातल्या जंगलातल्या एकाद्या तलावात आभाळातून पडलेल्या एकाद्या बिन्दुचे उठलेले तरंग असावेत  ते.

सैयद हैदर रझा साहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील बाबरीया गावातला. वडील फॉरेस्ट ऑफिसर, त्यामुळे लहानपण प्रत्यक्ष जंगलातच गेलेलं. जे जे मधून शिक्षण घेतल्या नंतर मुंबईत बर्‍यापैकी नाव कमावित असताना चित्रकलेच्या ओढीने रझा फ्रांसला गेला, वॅन गॉगच्या देशात. पुढे तिथेच रझाने जेनीशी लग्न केल. जेनीसुद्धा चित्रकार, शिल्पकार. दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत घर बनवले, संसार थाटला एक स्टुडिओ उभा केला. मात्र या पाश्चिमात्य संस्कारातही रझाने आपले भारतीयपण कटाक्षाने जपले. मध्यप्रदेशातील ते जंगल, तो निसर्ग आणि त्यातलं अध्यात्म रझाच्या या अॅबस्ट्रॅक्ट शैलीत आजही उमटते. 

बिन्दु आणि तरंग. ह्या आकृतीबंधाला सुरुवात नाही शेवट नाही. हा बिन्दु पुढे रझाच्या चित्राचा अविभाज्य भाग झाला. कधी तो सूर्य झाला, करपलेला काळा, तर कधी पाण्याचा थेंब निळा. रंग बदलले आकृती तीच, पण भाव किती वेगळे. नादबिन्दु’, प्रेमबिन्दु’, निळभ’, सत्यमेव . . सगळ्या आकृत्या सारख्याच फक्त रंग वेगळे.


ये चल ग, आपल्या तर डोक्यावरुन जातय      एक तरुण, बहुदा नवरा असावा.


समोरच्या भिंतीवर एक भव्य आडव चित्र. आकृती तीच. मध्ये बिन्दु मग विलग होत जाणारी वर्तुळं, उठलेले तरंग.   आत्मरस – संपूर्ण चित्र फिकट, मातकट रंगात रंगलेल. सगळे तरंग -

. .

            जेनी गेली. दोन हजार दोनच्या एप्रिल मध्ये पॅरिस मधल्या एका हॉस्पिटलात कॅन्सरशी झुंजताना तिने डोळे मिटले आणि रझा एकटा झाला. जेनी सुद्धा थोर चित्रकार होती. रझा सारखा जगप्रसिद्ध चित्रकार आयुष्याचा भाग झालेला असताना तिने स्वत:च वेगळं अस्तित्व जपल होत आणि मुख्य म्हणजे रझाला साथ दिली होती. लग्न झाल तेव्हा जेनी स्वत:च एक शिल्प होती. अत्यंत रेखीव, कातीव   फ्रेंच चेहर्‍याची जेनी आणि तितकाच रुबाबदार रझा अस हे एकमेकांसाठीच जन्मलेल जोडप शेवटी अशा तर्‍हेने विलग झाले.

. .

                                                                                                 - उदासवाणे. मध्यप्रदेशातल्या त्या जंगलातील तळ्यात एकाद उनाड जनावर घुसून सगळं पाणी गढूळ केल्यासारखे रंग. रंगाची समर्पक योजना हे रझाच वैशिष्ट्य. पण या चित्रात मात्र रझाच्या मनाचेच तरंग दिसत होते, उदासवाणे. चार कोपर्‍यात चार करड्या रंगांच्या शुष्क छटा.

उजवीकडे वळलो आणि चकित झालो. मघापासुन जे शोधत होते ते अवचित पुढे आल. रझाचा बिन्दु. एकोणीसशे अठ्ठयाऐंशी सालातल हे चित्र, जेव्हा रझाला बिन्दु सापडला. जेमतेम तीन फुट बाय तीन फुटाच हे चित्र. अत्यंत आखीव रेखीव. त्या चित्राच्या शेजारी दोन खुर्च्यांचा सेट मांडलेला, मध्ये एक भली मोठी संदूक. जसे एकाद्या श्रीमंत भिंतीवरच ते टांगलय असा भास निर्माण व्हावा. चित्राच्या बरोबर मध्ये तो काळा बिन्दु आणि त्याच्या सभोवती गडद रंगाच्या लाटांसदृश्य जाड आडव्या समांतर रेषा. काळ्या फ्रेम मध्ये बंदिस्त, भान हरपवणारा गडद रंगविष्कार.

आ कलर थोडा डार्क छे
मी चमकलो. रझाच्या चित्रावर इतकी बोल्ड प्रतिक्रिया ?

चित्राच्या शेजारच्या खुर्चीवर तो काळा गॉगलवाला बसला होता. डावा पाय उजव्या पायावर ठेवलेला आणि तो पांढरा शू एका तालात हालत होता. समोर चॉकलेटच्या रंगाची तंग ट्राऊजर घातलेली त्याची बायको उभी.

याss, आय टू फील सो

इससे तो वो चेअर का कलर अच्छा है और कोमफरटेबल भी है.

ट्राऊजरवालीने ओठांचा चंबू केलेला. नवर्‍याबद्दल कोण अभिमान नजरेत दाटून आलेला.

हाऊ मच इज धिस?’

एका पांढरकेशीने एक कटलोग त्याच्या समोर धरला. रझाच्या चित्रांच्या मध्ये काही खुर्च्या आणि सोफ्याची पण चित्रे आणि समोर बारीक अक्षरात काही आकडे लिहिले होते.

ना ना, वही सेट फायनल कर दो  


त्या मधल्या काळ्या बिन्दुच्या आणि आडव्या गडद लाटांच्या बरोबरीने काही नाजुक पांढर्‍या रेषा. त्या बिन्दुचा अपेक्षित विस्तार दर्शविणार्‍या. त्या इतक्या नाजुक की चित्रकाराच्या कुंचल्यावरच्या नियंत्रणाला दाद द्यावी.

काळा गॉगलवाला आता उठून उभा राहिला होता. सगळ्या गॅलेरीवर त्याने एक नजर टाकली. काळ्या चष्म्यातून सुद्धा तिची मग्रुरी जाणवत होती. ह्या काय चित्रविचित्र रंगांच्या फ्रेम भिंतीवर टांगलेल्या आहेत? विकायला बिकायला ठेवल्या असतील तर घेऊन टाकाव्या दोन चार.

मी पुढे सरकतो. पुढे विस्तार’. ज्या नावाने हे प्रदर्शन भरले होते ते चित्र. काहीसं करड्या रंगात पण सूर्यबिन्दु मात्र तोच. काळा करपलेला रंग. एका मोठ्या चित्र चौकटीत काही छोट्या चौकटी. रझाने ही अॅबस्ट्रॅक्टची एक वेगळीच शैली पुढे आणली होती. सहसा अॅबस्ट्रॅक्ट मध्ये आकार किंवा फॉर्म नसतात. किंबहुना चित्रकाराच्या चित्रातले फॉर्म मिटत जावू लागले की तो पूर्ण अबोध होत जातो. पण रझा आकारांची साथ सोडत नाही. मात्र त्यांची रचना आणि रंगांच्या योजनेतून तो बोलत राहतो. ते आकारच त्याचे शब्द बनतात. 

पाठीमागे मूल किंचाळण्याचा आवाज.

व्हेर इज ही? अब्बास किधर है?’

वॉचमन आस्क्ड हिम टु रीमूव द कार 

आय टोल्ड दॅट बास्टर्ड, नॉट टु पार्क देअरss. आगे वन वे भी है

काळ्या गॉगलवाल्याचा आवाज आता चढला होता.
मूल आणखी जोरात रडत होत.
त्या ट्राऊजरवालीला कळत नव्हतं आता नेमकं कुणाला सांभाळाव.

मी पुन्हा पहिल्या चित्रापाशी उभा होतो.
सर्वत्र – त्या मधल्या काळ्या सूर्याची दाट छाया पसरली होती सर्वत्र, चित्रभर. विविध आकार. बहुतेक सगळे त्रिकोण. उलटसुलट रांगेत मांडलेले. गडद रंगाच्या अनेकविध छटा.

आ केम छे?’

ए डेकोरेटीव पीस.

काळ्या गॉगलवाल्याच्या हातात एक चौकोनी सिरॅमिक डिश होती. तिच्या मध्यभागी रझाच एक चित्र छापलेल – 'सूर्यनमस्कार'.

डिश टेबलावर सरकवली आणि तो पुढे वळला. एक उभट कपासारखे काही तरी हातात होते, त्यावर रझाचा एक छोटासा सूर्य.

ये क्या, कॉफी मग है क्या?’    

नो नो, कॅन्डल छे.

केटलो रुप्या

इक हजार

ओह टू कॉस्टली आss’

ती पांढरकेशी उदासवाणी हसली. आता तिला या छोट्या मोठ्या गोष्टीत इंट्रेस्ट राहिला नव्हता. तिच्या दोन खुर्च्या विकल्या गेल्या होत्या रग्गड भावात. 

बाहेर पडलो. जहागीरच्या दरात उभा होतो. गोलाकार पायर्‍यांवर उन्हं उतरली होती. त्यांना पकडत माझी नजर जेव्हा त्याच्याकडे पोहोचली तोही धुरकट, काळपट दिसत होता. रझाच्या चित्रातल्या सारखा.

आता पैसे आले की पहिल्यांदा चश्मा बदलायला हवा.

-    प्रदीप इंदुलकर